Hardik Pandya Angry MIvsPBKS pudhari
स्पोर्ट्स

Hardik Pandya Angry MIvsPBKS: आता निर्णय घ्यावाच लागेल... कर्णधार पांड्या भडकला, तीन दिग्गजांपैकी कोण हार्दिकच्या रडारवर?

Anirudha Sankpal

Hardik Pandya MI vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या २४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा हाराकिरी केली. पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात मुंबईचा सात विकेट्सने पराभव झाला. हा मुंबई इंडियन्सचा हंगामातील सलग चौथा पराभव आहे. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या जाम भडकला होता. त्याने आता टीममध्ये काही कठीण निर्णय घ्यावे लागतील आणि जबाबदारी घ्यावी लागेल असं सांगितलं.

सामन्यात काय घडलं?

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ६ बाद १९५ धावा केल्या. त्यात क्विंटन डिकॉकने जबरदस्त नाबाद ११२ धावांची खेळी केली. मात्र त्याच्या या शतकी खेळीनंतरही मुंबई इंडियन्सला २०० चा टप्पा परा करता आला नाही. नमन धीर ५० तर कर्णधार पांड्याने १४ धावा केल्या. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने दमदार गोलंदाजी करत २२ धावात ३ बळी टिपले. तर शशांक सिंहने एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्सचे १९५ धावांचे आव्हान पंजाब किंग्जने सहज पार केले. प्रभसिमरन सिंगने ३९ चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३५ चेंडूत ६६ धावांची दमदार खेळी केली. या दोघांनी तिसऱ्य विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी रचत मुंबईला पराभावच्या खायीत लोटले. त्यांनी सामना १६.३ षटकातच खिशात घातला.

सामन्यानंतर हार्दिक पांड्या भडकला

या दारूण झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या जाम भडकला होता. त्याने आता संघात काही कडक आणि कठिण निर्णय घ्यावे लागतील किंवा आम्हाला अशाच प्रकारे पुढं जावं लागेल. काही असे प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर आम्हाला द्यावेच लागेल. आम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. आम्हाला ड्रॉईंग बोर्डवर परत जावं लागणार आहे आम्हाला आमच्यात काय उणीव आहे हे पहावं लागणार आहे. वैयक्तिकरित्या, संघ म्हणून किंवा आमच्या प्लॅनिंगबाबत आता विचार करण्याची वेळ आलेली आहे.

हार्दिक पांड्याने पंजाब किंग्जच्या खेळाची स्तुती केली. तो म्हणाला त्यांनी प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली. त्यांनी आमच्यापेक्षा चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील केलं. त्यामुळंच आमचा पराभव झाला.

कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता?

मुंबई इंडियन्ससाठी या हंगामात त्यांच्या संघातील अनेक दिग्गज त्यांच्या लौकिकास साजेसा खेळ करू शकलेले नाहीत. सूर्यकुमार यादव पंजाब किंग्जविरूद्ध भोपळाही फोडू शकला नाही. तो गोल्डन डकचा शिकार झाला. गेल्या पाच सामन्यात त्याने फक्त १०६ धावा केल्या आहेत.

गोलंदाजीत बुमराहची कामगिरी देखील चिंतेचा विषय आहे. त्याने हंगामात १९ षटके गोलंदाजी केली असून त्याला अजून एकही विकेट घेता आलेली नाही. बुमराहच्या बॅडपॅचमुळे मुंबई इंडियन्सला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. तिलक वर्मा देखील खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने भारताकडून टी २० मध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने पाच सामन्यात फक्त ४३ धावा केल्या आहेत.

हार्दिक पांड्याने दिले संकेत

पांड्याने सलग पराभवानंतर संकेत दिले की संघ व्यवस्थापन काही कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे. आगामी सामन्यात बुमराह, तिलक वर्मा किंवा सूर्यकुमार यादव यापैकी एक किंवा दोन खेळाडूंना प्लेईंग ११ मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

पंजाबविरूद्ध सूर्या शुन्यावर तर तिलक ८ धावा करून बाद झाले होते. बुमराहने ४ षटकात ४१ धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट घेता आलेली नाही. जर संघ पुढच्या एक दोन सामन्यात पुनरागमन करू शकला नाही तर ते प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT