चक्रीवादळामुळे टीम इंडियाचे उड्डाण लांबले  file photo
स्पोर्ट्स

चक्रीवादळामुळे टीम इंडियाचे उड्डाण लांबले

पुढारी वृत्तसेवा

बार्बाडोस : वृत्तसंस्था : चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे टी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ बार्बाडोसमध्ये अडकला आहे. वार्बाडोसमधील सर्व विमानतळे बंद ठेवण्यात आली आहेत. बार्बाडोसमधील वादळातून खेळाडूंसह सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे 'बीसीसीआय'ने म्हटले आहे. यासाठी त्यांनी आपला प्लॅनही बदलला आहे. 'पीटीआय'च्या रिपोर्टनुसार संधी मिळताच सर्व ७० सदस्यांना आता ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथून चार्टर फ्लाईटद्वारे थेट नवी दिल्लीला आणले जाईल.

बेरील चक्रीवादळ रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार वार्बाडोसच्या जवळून दक्षिण किनाऱ्यापासून सुमारे ८० मैल अंतरावर वादळाच्या केंद्रस्थानी जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना ब्रिजटाऊन बार्बाडोस येथे खेळला गेला. या मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वविजेता बनला. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफ भारताला रवाना होणार होते; पण इतक्यात बार्बाडोसमध्ये वादळाची घोषणा करण्यात आली. यामुळेच टीम इंडिया हॉटेलमध्ये अडकली आहे. भारतीय संघाचा सध्या हिल्टन हॉटेलमध्ये मुक्काम आहे. रविवारी संध्याकाळपासून विमानतळ बंद आहे. दक्षिण आफ्रिका रविवारी आधी रवाना झाली होती. हवामान खात्याच्या दाव्यानुसार, बेरील चक्रीवादळ ६ तासांत बार्बाडोसच्या भूमीवर धडकणार आहे. अशा परिस्थितीत खबरदारी घेत सर्व विमानतळ बंद करण्यात आले असून, लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

'बीसीसीआय'ने बदलली योजना

भारतीय संघ परदेशातून परतल्यावर मुंबई विमानतळावर उतरतो. मात्र, यावेळी सर्व खेळाडू नवी दिल्लीत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंची भेट घेण्याची शक्यता आहे. २०११ मध्येही जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली तेव्हा एम. एस. धोनीसह संपूर्ण टीमने नवी दिल्लीत तत्कालीन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेतली होती.

जगज्जेत्या टीम इंडियावर कागदी प्लेटमध्ये खाण्याची वेळ

भारतीय संघ रविवारी बार्बाडोसमधून रवाना होणार होता. परंतु, चक्रीवादळामुळे त्यांचा मुक्काम वाढला. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, 'बीसीसीआय'चे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसह एकूण ७० सदस्यांना हिल्टन हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. अचानक झालेल्या कार्यक्रमातील बदलामुळे हॉटेल व्यवस्थापनावरही ताण आला. हॉटेलमध्ये कमी कर्मचारी असल्यामुळे टीम इंडियाला रात्री रांगेत उभे राहून पेपर प्लेटमध्ये जेवण करावे लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT