Cheteshwar Pujara Cheteshwar Pujara
स्पोर्ट्स

Cheteshwar Pujara: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजारा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

Cheteshwar Pujara retirement: भारतीय संघाचा विश्वासार्ह फलंदाज आणि टेस्ट क्रिकेटचा आधारस्तंभ असलेला चेतेश्वर पुजारा रविवारी सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

मोहन कारंडे

Cheteshwar Pujara retirement

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज फलंदाज आणि कसोटी क्रिकेटचा 'आधारस्तंभ' म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा याने रविवारी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयामुळे एका चिवट आणि अविस्मरणीय कारकिर्दीवर पडदा पडला आहे. भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आठव्या क्रमांकावर आहे.

पुजाराने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६० च्या सरासरीने ७,१९५ धावा केल्या, ज्यात १९ शतकांचा समावेश आहे. कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आलेल्या खराब फॉर्ममुळे त्याची सरासरी किंचित घसरली असली, तरी राजकोटच्या या शांत योद्ध्याची कारकीर्द आकड्यांमध्ये आणि प्रवासातही तितकीच अभिमानास्पद राहिली आहे. शिस्त आणि अथक परिश्रमातून घडलेल्या पुजाराची गोष्ट राजकोटमधून सुरू झाली. त्याचे वडील अरविंद, जे स्वतः प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि रेल्वे कर्मचारी होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो कोठी ग्राऊंडवरील लिंबाच्या झाडाखाली दररोज हजारो चेंडूंचा सराव करत असे. या खडतर प्रवासातून त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आणि कसोटी क्रिकेटवरील आपल्या निस्सीम प्रेमाने आणि चिकाटीने एक वेगळी ओळख निर्माण केली.

पुजाराची भावनिक पोस्ट

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना पुजाराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. तो म्हणाला, "भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि प्रत्येक वेळी मैदानात उतरल्यावर माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणे, या भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतोच. मी अत्यंत कृतज्ञतेने भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक आभार."

ऑस्ट्रेलियातील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचा शिल्पकार

भारताने अनेक आक्रमक आणि शैलीदार फलंदाज दिले असले, तरी डाव सावरण्याची आणि प्रचंड दबाव सहन करण्याची पुजाराची क्षमता अतुलनीय होती. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या भारताच्या पहिल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचा तो शिल्पकार होता. या मालिकेत त्याने ५२१ धावा केल्या आणि तब्बल १,२५८ चेंडूंचा सामना केला. यात त्याने तीन शतके झळकावली. त्याच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची तुलना सुनील गावसकर यांच्या १९७०-७१ मधील वेस्ट इंडिज दौऱ्यातील ७७४ धावांच्या विक्रमाशी आणि त्याच हंगामात इंग्लंडमध्ये दिग्गज फिरकी त्रिकुटाने घेतलेल्या ३७ बळींशी केली जाते. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग दोन वेळा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो कणा होता. त्याने आपल्या संयमी फलंदाजीने जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणाला हतबल केले आणि भारताच्या ऐतिहासिक विजयांचा पाया रचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT