पुढारी ऑनलाईन डेस्क | Champions Trophy 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हायचे का नाही याचा पूर्णपणे निर्णय भारत सरकार घेईल, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. याआधी पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने भारताने हायब्रीड पद्धतीने श्रीलंकामध्ये खेळले होते. परंतु, यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने भारताने पाकिस्तानमध्ये खेळावेत यासाठी पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये आयसीसी मध्यस्थी करण्याचे वृत्त समोर येत आहे.
2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानला पाठवण्याचे काम पीसीबीने आयसीसीवर सोपवले आहे. कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आयसीसीने आपल्या स्पर्धेच्या बजेटमध्ये पूरक खर्च ठेवला आहे. यामध्ये भारतीय संघ पाकिस्तानबाहेर खेळण्याच्या शक्यतेचाही समावेश आहे.
पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणे हा पूर्णपणे भारत सरकारचा निर्णय आहे, असे बीसीसीआयने नेहमीच सांगितले आहे. याआधी भारतानेही पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी संघ पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर श्रीलंकेत हायब्रीड मॉडेलच्या आधारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
PCB ने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मसुद्याच्या वेळापत्रकातील भारताचे सर्व सामने लाहोरला आयोजित करण्याची सूचना केली आहे, त्यात भारत पात्र ठरल्यास उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा समावेश आहे. पीसीबीने आता स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम करणे आणि जाहीर करणे आणि भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबद्दल बीसीसीआयकडून पुष्टी मिळवणे हे आयसीसीवर सोडले आहे.