ball tampering helped team india win oval test shabbir ahmed's controversial statement
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर चषकाच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत भारताने मिळवलेल्या रोमहर्षक विजयानंतर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शब्बीर अहमदने भारतीय संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. इतकेच नव्हे, तर सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी वापरण्यात आलेला चेंडू 'प्रयोगशाळेत तपासणीसाठी' पाठवावा, अशी मागणीही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पंचांकडे केली आहे. भारताने हा सामना केवळ सहा धावांनी जिंकून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली, ज्यानंतर शब्बीरची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी मोहम्मद सिराज जवळपास ८० षटके जुन्या चेंडूवर दोन्ही बाजूंना स्विंग प्राप्त करत होता. प्रसिद्ध कृष्णानेही त्याला उत्तम साथ दिली. सिराजइतकी स्विंग कृष्णाला मिळाली नसली, तरी त्यानेही चेंडूला चांगलीच गती आणि दिशा दिली. भारतीय गोलंदाजांचा जुन्या चेंडूवरील प्रभाव इतका होता की, इंग्लंडचे अखेरचे तीन बळी मिळवण्यासाठी ३० पेक्षा कमी धावांची आवश्यकता असतानाही कर्णधार शुभमन गिलने दुसरा नवीन चेंडू घेण्याचा विचारही केला नाही आणि हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरला.
सिराजने उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी चेंडू सातत्याने बाहेरच्या बाजूला स्विंग केला आणि त्याचवेळी काही फुल लेंथ चेंडू आतल्या बाजूला आणून इंग्लंडच्या तळातील फलंदाजीला खिंडार पाडले. प्रथम त्याने इंग्लंडचा अखेरचा आक्रमक फलंदाज जेमी स्मिथला एका अप्रतिम आउटस्विंगरवर बाद केले. त्यानंतर, आदल्या दिवशी नाबाद राहिलेल्या जेमी ओव्हरटनला एका धारदार इनस्विंगरवर पायचीत पकडले.
सुरुवातीचे काही बळी मिळवल्यानंतर सिराज आणि कृष्णाने इंग्लंडच्या धावगतीवर पूर्णपणे अंकुश लावला. कृष्णाने जोश टंगला जवळपास बाद केले होते, परंतु डीआरएसमुळे (DRS) हा निर्णय बदलावा लागला. तथापि, त्यानंतर लगेचच कृष्णाने एका अप्रतिम यॉर्कर चेंडूवर टंगच्या यष्ट्या उडवल्या. संपूर्ण सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर, चेंडू कितीही जुना असला तरी सिराज आणि कृष्णाने अनेक बळी मिळवून देणारे चेंडू टाकले. खेळपट्टीची मदत आणि ढगाळ हवामान असले तरी, भारतीय वेगवान गोलंदाजांच्या कौशल्याला दाद द्यावीच लागेल. त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि इंग्लंडचे अखेरचे सात बळी केवळ ६६ धावांत मिळवले.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शब्बीर अहमद मात्र भारतीय गोलंदाजांच्या कौशल्याचे कौतुक करण्यास तयार नाही. त्याऐवजी, त्याने चेंडूची चमक कायम ठेवण्यासाठी 'व्हॅसलीन' वापरल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानसाठी १० कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळलेल्या या माजी उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने खेळपट्टी, ढगाळ हवामान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिराज व कृष्णा यांचे गोलंदाजीतील कसब याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
त्याने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, ‘माझ्या मते, भारतीय गोलंदाजांने व्हॅसलीनचा वापर केला. ८० पेक्षा जास्त षटके जुना झालेला चेंडू अजूनही नव्यासारखा चमकत होता. पंचांनी हा चेंडू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा.’
भारताच्या या ऐतिहासिक विजयावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, शब्बीर अहमदच्या या आरोपांमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतीय गोलंदाजांचे कौशल्य आणि इंग्लंडच्या फलंदाजांची हाराकिरी यावर चर्चा होण्याऐवजी आता चेंडू छेडछाडीच्या या आरोपाने क्रिकेटजगतात चर्चा सुरू झाली आहे. आयसीसी यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एखाद्या पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाजाने भारतावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही.
२०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत जेव्हा मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि सिराज यांनी स्पर्धेतील इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा नवीन चेंडू अधिक स्विंग केला होता, तेव्हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा म्हणाला होता की, आयसीसी भारताला ‘वेगळा चेंडू’ देत आहे.
तसेच भारताने जिंकलेल्या २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. यावर मोहम्मद शमीने त्याला सडेतोड उत्तर दिले होते.