“Hushpitality” हा नवीन ट्रॅव्हल ट्रेंड असून, तो शांतता, प्रायव्हसी आणि डिजिटल डिटॉक्सवर आधारित आहे. वाढत्या गर्दी, सोशल मीडियाचा थकवा आणि मानसिक आरोग्याच्या गरजेमुळे प्रवासी आता कमी प्रसिद्ध, निसर्गरम्य आणि शांत ठिकाणांकडे वळत आहेत. हा ट्रेंड केवळ प्रवासाचा नाही, तर जीवनशैलीतील बदलाचा प्रतीक मानला जात आहे.
what is hushpitality travel trend digital detox nature peace tourism
Hushpitality' (हुशपिटॅलिटी) हा शब्द 'Hush' (शांतता) आणि 'Hospitality' (पाहुणचार) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि सोशल मीडियाच्या सततच्या गोंगाटात वैतागलेले लोक आता अशा ठिकाणांना पसंती देत आहेत जिथे पूर्णपणे शांतता असेल. एकांत मिळेल, जिथे मोबाईलला नेटवर्क येत नसेल, अशा ठिकाणी जाऊन वेळ घालवण्याकडे लोक वळताहेत. यामध्ये मोबाईल-इंटरनेटपासून दूर राहून (डिजिटल डिटॉक्स), केवळ निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यावर भर दिला जातो. हा केवळ प्रवास नसून मानसिक, अध्यात्मिक आणि मनाला उभारी देणारा एक सुंदर अनुभव आहे.
हा ट्रेंड का वाढतोय?
ट्रॅव्हल ट्रेंड रिपोर्टनुसार, पर्यटक आता फक्त 'विश्रांती आणि रिचार्ज' होण्यासाठी प्रवास करत आहेत. जगभरातील आयटी प्रोफेशनल्स आणि शहरातील तरुणांचा या ट्रेंडकडे जास्त कल आहे.
या ट्रेंडची वैशिष्ट्ये काय आहेत?
नो गॅजेट्स झोन: अनेक रिसॉर्ट्स, हॉटेल्समध्ये मुद्दाम वाय-फाय दिले जात नाही. जेणेकरून डिजिटल डिटॉक्स होईल.
लॉन्ग स्टे: लोक ३-४ दिवसांच्या सहलीऐवजी १०-१५ दिवस एकाच ठिकाणी राहून निसर्ग अनुभवत आहेत.
स्थानिक संस्कृती: घाईघाईने प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापेक्षा स्थानिक जेवण आणि संस्कृतीशी जोडले जाण्यावर भर दिला जातो.
काय म्हणतात डॉक्टर?
डॉक्टर या प्रावासाबद्दल म्हणतात- ''प्रवासाच्या सवयी कशा बदलत आहेत ते लक्षात घ्या. डिजिटल डिटॉक्स आणि निसर्गरम्य ठिकाणे हे दर्शवतात की, लोक सततच्या धावपळीपेक्षा शांतता आणि वर्तमानात असण्याला अधिक महत्त्व देतात.''
''हशपिटॅलिटी'चा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला "आलिशान" प्रवासाच्या नियोजनाची गरज नाही. फक्त उत्तम नियोजन करा, इतकेच. कमी बजेटच्या सुट्टीतही ही शांतता अनुभवता येते.''
''शांत प्रवास करणे ही काही नवीन गोष्ट नाही. नवीन आहे तो म्हणजे हेतू. ही एक अशा प्रवासाची रचना आहे, ज्यामुळे परत आल्यावर तुमच्या भावनांमध्ये खरोखरच बदल घडेल.''
भारतातील या ट्रेंडचे हॉटस्पॉट्स कोणते आहेत?
१. उत्तर भारत
ऋषिकेश (उत्तराखंड) - योगाची जागतिक राजधानी असलेल्या ऋषिकेशमध्ये 'शांतता शिबिरे' लोकप्रिय आहेत.
धरमशाळा आणि जिभी (हिमाचल प्रदेश): धौलाधार रांगांच्या कुशीत असलेले हे भाग 'स्लो ट्रॅव्हल'साठी ओळखले जातात. येथे मोबाईल नेटवर्कपासून दूर राहून निसर्गाचा आनंद घेता येतो.
स्पिटी व्हॅली (लडाख): 'अॅस्ट्रो-टूरिझम' आणि शांततेसाठी स्पिती व्हॅली हा एक मोठा ट्रेंड बनला आहे.
२. दक्षिण भारत
कूर्ग (कर्नाटक): कॉफीच्या मळ्यांमध्ये वसलेले होमस्टे आणि निसर्गाची भ्रमंती हे 'Hushpitality'चे केंद्र मानले जाते.
केरळ (बॅकवॉटर्स आणि वायनाड): केरळमधील बॅकवॉटर्समध्ये हाऊसोट स्टे आणि वायनाडमधील चहाच्या मळ्यांमधील 'वेलनेस रिसॉर्ट्स' पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
गोकर्ण (कर्नाटक): गोव्याच्या तुलनेत गोकर्णमधील समुद्रकिनारे शांत असून तेथे 'माइंडफुलनेस' प्रवासावर भर दिला जातो.
३. कोकण कोस्टल (महाराष्ट्र)
कोकण किनारपट्टी लगतचे अनेक समुद्र किनारे इतके शांत आहेत की, तुम्ही तिथे जाऊन स्वत:ला शोधू शकता. मन, मेंदू, शरीर रिलॅक्स करण्यासाठी नीरव शांतता असणाऱ्या बीचेसपैकी सिंधुदुर्ग (भोगवे बीच), कोंडुरा बीच, खवणे बीच, वायंगणी, तळाशील, देवघळी (कशेळी) समुद्रकिनारे सांगता येतील. जुवा पाणखोल बेट, वालावल याठिकाणीही बॉडी रिलॅक्ससाठी किमान दोन दिवस राहता येते.
नाशिक (इगतपुरी): वाईनरी आणि वनराईच्या कुशीत वसलेले अनेक होमस्टे सध्या 'डिजिटल डिटॉक्स'साठी ट्रेंडमध्ये आहेत.
४. ईशान्य भारत
माजुली (आसाम): जगातील सर्वात मोठे नदी बेट असलेल्या माजुलीमध्ये जीवनशैली आणि शांतता अनुभवण्यासाठी पर्यटक जात आहेत.
मेघालय: येथील शिलाँग आणि तवांग (अरुणाचल) मधील मठ (Monasteries) शांततेच्या शोधात असलेल्या प्रवाशांसाठी उत्तम आहेत.
यामध्ये तुम्ही भूतान देखील निवडू शकता.
अनेक पर्यटक आता आलिशान हॉटेलऐवजी जंगलातील साध्या पण शांत कॉटेजेसना पसंती देत आहेत. आगामी काळात लोक अनुभव देणाऱ्या पर्यटनाला जास्त महत्त्व देतील. 'Hushpitality' हा त्याचाच एक भाग आहे. जर तुम्हालाही रोजच्या कटकटींपासून सुटका हवी असेल, तर एकदा 'हुशपिटॅलिटी'चा अनुभव नक्की घेऊन पाहा.