space earmarked for dilip kumar museum in his bandra house to be sold
पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी त्यांचे दिवंगत पती आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरातील बंगल्याचा काही भाग विकण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या जागेवर दिलीप कुमार यांच्या स्मृती आणि कारकिर्दीला समर्पित संग्रहालय उभारण्याची घोषणा करण्यात आली होती.
दिलीप कुमार यांचा बंगला पुनर्विकसित करून येथे ‘द लिजेंड बाय आशर’ नावाची ११ मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील १,६९६ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाची व्यावसायिक जागा विकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, याच जागेवर दिलीप कुमार यांच्या वारशाचे जतन करण्यासाठी संग्रहालय उभारण्याची घोषणा आशर ग्रुपने २०२३ मध्ये केली होती.
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, संग्रहालयासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या जागेसाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या जागेसोबत तीन कार पार्किंगची सुविधाही देण्यात आली होती.
रिअल इस्टेट क्षेत्रातील आणखी एका व्यक्तीने हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, संग्रहालयासाठी राखीव असलेल्या या जागेची विक्री ‘अंतर्गत पातळीवर’ केली जात आहे.
पुनर्विकास करण्यापूर्वी झालेल्या विकास करारानुसार, सायरा बानो यांच्या वैयक्तिक गरजा, देणी, कर आणि इतर खर्चांसाठी त्यांना ३५० कोटी रुपयांची परतफेडयोग्य ठेव देण्यात येणार होती. पुनर्विकसित इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम त्यांना परत करायची आहे.
‘द लिजेंड’मधील सायरा बानो यांच्या मालकीचा हिस्सा विक्रीस काढल्यास त्यातून मिळणाऱ्या रकमेचा पहिला वापर ३५० कोटी रुपयांच्या परतफेडीसाठी केला जाईल. त्यामुळे संग्रहालयासाठी राखीव असलेली जागाही ही रक्कम फेडण्यासाठी विकली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्राने सांगितले.
आशर ग्रुपच्या संचालिका आयुषी आशर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. आशर ग्रुप आणि ब्लॅक रॉक सीए यांच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. सुमारे १.७५ लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या प्रकल्पात २० पेक्षा कमी अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट्स आहेत. या घरांचे क्षेत्रफळ ३,२०० ते ७,००० चौरस फूटांदरम्यान आहे.
बंगल्याच्या मालकीवरून झाला होता वाद
२०१८ मध्ये दिलीप कुमार यांचा हा बंगला चर्चेत आला होता. सायरा बानो यांनी एका विकासकावर बंगला बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संबंधित विकासकाला अटक करण्यात आली होती आणि नंतर त्याची जामिनावर सुटका झाली.
या मालमत्तेशी संबंधित कायदेशीर वाद अखेर सामोपचाराने सोडवण्यात आले. सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्या विकासकासोबत आणि एप्रिल २०२३ मध्ये सध्याच्या विकासकासोबत संमतीच्या अटींवर करार करण्यात आला. त्यानंतर या मालमत्तेच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला.