Bad Boy of Bollywood : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांनी नेटफ्लिक्सच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' (Bad Boy of Bollywood) या वेबसिरीज विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी नेटफ्लिक्स आणि शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट (Red Chillies Entertainment) यांच्या विरोधात ही मानहानीची याचिका दाखल केली आहे. वानखेडे यांनी शाहरुख खान, त्यांची पत्नी गौरी खान यांची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर पक्षांकडून २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. ही रक्कम कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला देणगी देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या याचिकेनुसार, वेबसिरीज बॅड्स ऑफ बॉलिवूडमधील एका पात्राचे नाव 'समीर वानखेडे' असे आहे. या पात्राच्या माध्यमातून एनसीबी आणि वानखेडे यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांनी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश, घोषणात्मक मदत आणि नुकसान भरपाईची मागणी करणारा मानहानीचा खटला दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केला आहे. "द बॅड बॉईज ऑफ बॉलीवूड" या टेलिव्हिजन मालिकेचा भाग म्हणून रेड चिलीजने तयार केलेल्या आणि नेटफ्लिक्सवर प्रसारित केलेल्या खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक व्हिडिओमुळे झालेल्या नुकसानीसाठी हा खटला दाखल करण्यात आला आहे.
वेबसिरीजमध्ये 'सत्यमेव जयते' हा डायलॉग बोलल्यानंतर आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्यामुळे 'सत्यमेव जयते'ची विटंबना झाल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला आहे.या मानहानीचा दावा जवळपास २ कोटी रुपयांचा असून, ही रक्कम मिळाल्यास ती कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी वापरली जाईल, असेही याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.
शाहरुख खान याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरअंतर्गत तयार झालेली वेब सीरीज द बॅड्स ऑफ बॉलीवूडमधून त्यांचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. ही सीरीज बॉलीवूडवर आधारित आहे. कॉमेडी ड्रामा असून चित्रपट इंडस्ट्रीतील नेपोकिड्स आणि आऊटसायडर्सवर आधारित आहे. या सीरीजमध्ये लक्ष्य राणा, राघव जुयाल, आन्या सिंह, सहर बांबा, मोना सिंह, बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय मनोज पाहवा, गौतमी कपूर, मनीष चौधरी, रजत बेदी महत्वाच्या भूमिकेत आहेत.
एनसीबी (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो)चे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांनी २ ऑक्टोबर २०२१ मुंबईत क्रूझ शिपवर छापा टाकला होता. या पार्टीत शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान होता.ड्रग्स प्रकरणी आर्यन खानवर कारवाई झाल्याने खळबळ माजली होती. एनसीबीने आर्यन खानसह अन्य संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर ड्रग्स घेण्याचा आणि विक्रीचा आरोप करण्यात आला.
क्रूझ शिपवर छापा प्रकरणी आर्यन खानला जामीन मिळाला. यानंतर काही महिन्यांनंतर न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवले. एनसीबीने यावेळी त्याच्यावर ड्रग्स वापरण्याचा आणि विक्रीचा आरोप केला, परंतु न्यायालयाने सांगितले की आर्यन खानच्या विरोधात पुरावे अपूर्ण होते. त्यावर त्याची निर्दोष सुटका झाली.त्यामुळे समीर वानखडे यांनी केलेली कारवाई वादाच्या भोवर्यात सापडली. तसेच या कारवाईवर राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. वानखडे आणि त्याच्या टीमच्या सदस्यांनी पैसे उकळण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोपही झाला.