Samay Raina Indias Got Latent controversy : स्टँड-अप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडला आहे. यावेळी बिहारमधील नागरिक आणि काश्मिरी पंडितांशी संबंधित केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद निर्माण झाला आहे. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लैटेंट' (सीझन २) या शोचा नवा एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर यावरून गदारोळ सुरू झाला आहे. या शोचे काही भाग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यात केलेल्या टिप्पणींवर राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
'इंडियाज गॉट लैटेंट'च्या नवीन भागात समय रैना स्टँड-अप कॉमेडियन शेरोन वर्माची ओळख करून देताना तिच्या बिहारी पार्श्वभूमीवर विनोद करतो. समय म्हणाला, "ही बिहारची आहे आणि इतकी बिहारी आहे की तिला वाटतं 'इबोला' म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललं (ई बोला)." यावर प्रत्युत्तर देताना शेरोनने समयच्या काश्मिरी मूळ असण्यावर निशाणा साधला. ती म्हणाली, "समय इतका काश्मिरी आहे की त्याला स्वतःवर दगड भिरकावून घेणे (दगडफेक करणे) आवडते."
यावर समय म्हणाला, "शेरोन ही अशी बिहारी आहे जी नोकरीच्या शोधात मुंबईत आली. ही खरंच बिहारियांसारखी गोष्ट आहे." त्यावर उत्तर देताना शेरोन म्हणाली, "किमान मी माझे घर स्वतःच्या मर्जीने तरी सोडले." समय रैना हा मूळचा काश्मीरचा असून, ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांचे झालेले विस्थापन हा आजही संवेदनशील विषय आहे; त्यामुळे या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
"काहीही बोलून फुकटची प्रसिद्धी मिळवणे ही काहींची प्रवृत्ती बनली आहे. प्रसिद्ध होणे हाच त्यांचा एकमेव हेतू असतो. सनातन हिंदू धर्माच्या देवी-देवता आणि काश्मिरी पंडित हे उपहासाचे विषय असू शकत नाहीत, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे," अशा शब्दांत भाजप आमदार राम कदम यांनी आक्षेपार्ह विधानांचा समाचार घेतला. "आधी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह बोलायचे आणि नंतर माफी मागायची, यामुळे त्यांना देशभरात फुकटची प्रसिद्धी मिळून जाते," असा टोलाही त्यांनी लगावला.
या वादावर 'विश्व काश्मिरी समाजा'चे संयोजक किरण वट्टल म्हणाले की, "हे लोक जे विनोदी कार्यक्रम करतात, ते केवळ एक नाटक किंवा सोंग करत असतात. अशा कार्यक्रमांमध्ये त्यांना श्रद्धा, तत्त्वे किंवा सदसद्विवेकबुद्धी याचे काहीही देणेघेणे नसते. आपल्या कार्यक्रमासाठी ते कोणाचीही, अगदी अन्याय सहन केलेल्या लोकांचीही थट्टा करू शकतात. नेमके हेच समयने केले. ३६ वर्षे हालअपेष्टा सोसलेल्या, आपल्या घरांतून विस्थापित झालेल्या आणि मुळांपासून तोडल्या गेलेल्या एखाद्या व्यक्तीची किंवा समुदायाची थट्टा केल्याने आपला टीआरपी (TRP) वाढेल, असे त्याला वाटले. परंतु, आमचा संपूर्ण समुदाय त्याला चोख आणि सडेतोड उत्तर देईल."
या भागात अभिनेत्री अर्चना पूरन सिंह आणि 'ओरी' (ऑर्हान आवत्रमाणी) हे देखील परीक्षक म्हणून उपस्थित होते. शोदरम्यान ए. आर. तिवारी या स्पर्धकाने भोजपुरी शायरी आणि रॅप सादर केले. तो व्ह्लॉगिंग करतो असे सांगितल्यावर समयने अर्चना पूरन सिंह यांच्या व्ह्लॉग्सचा संदर्भ देत टोमणा मारला, "व्ह्लॉगिंग करायला कसले टॅलेंट लागते?". यावर अर्चना पूरन सिंह यांनी समयला तत्काळ रोखठोक प्रत्युत्तर दिले. "शिव्या देणे हा टॅलेंट आहे का?" असा थेट सवाल त्यांनी समयला विचारला. अर्चना यांच्या या सडेतोड उत्तरावर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या, तर समयकडे यावर कोणतेही उत्तर नव्हते. सोशल मीडियावर या एपिसोडचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून शोच्या दर्जावर आणि भाषेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले जात आहेत.