पुढारी ऑनलाईन डेस्क : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो. व्हॅलेनटाईनच्या निमित्ताने या महिन्यातील पहिल्या आठवड्यातील सर्व दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. आज (दि.७) 'रोज डे' ( Rose Day Special ) साजरा केला जात आहे. प्रेमाचा महिना आणि बॉलिवूडचा विषय नसेल असे कधी होणार नाही. बॉलिवूडमध्ये सिनेमाच्या बाहेर देखिल अनेक प्रेमकथा रंगल्या आहेत. अशीच एक रेट्रो लव्ह स्टोरी बॉलिवूडमध्ये फेमस आहे. ज्याची सुरुवात गुलाबाचे फुल देऊन झाली होती. अर्थात ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि मधुबाला यांचीही लव्ह स्टोरी आहे. या दोघांच्या प्रेमकथेचा अंत जरी चांगला झाला नसला तरी त्या काळी व आत्ता सुद्धा या प्रेमाच्या अनेक गोष्टी चर्चिल्या जातात.
पहिली भेट ( Rose Day Special )
दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी १९५१ साली 'तराना' नावाच्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दोघांची पहिली भेट याच चित्रपटादरम्यान झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर त्या दोघांनी आणखी ३ चित्रपटात एकत्र काम केले. मधुबाला यांनी प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलीप कुमार यांना एक चिठ्ठी आणि गुलाब पाठवले होते. त्यात लिहलं होतं, ' जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही या गुलाबाचा स्विकार कराल'. दिलीप कुमार यांना मधुबाला खूप आवडत होत्या आणि ते मधुबालावर खूप प्रेम करत होते. त्यामुळे त्यांनी कोणतीच तमा न बाळगता मधुबाला यांनी पाठवलेल्या गुलाबाचा स्विकार केला.
साखरपुडा सुद्धा झाला होता ( Rose Day Special )
फिल्मफेअर मॅगझिनमधील एका मुलाखतीत मधुबाला यांची बहिण मधुर बृजभूषण यांनी सांगितले होते, ' मधुबाला ही दिलीप कुमार यांना 'तराना' चित्रपटाच्या सेट पहिल्यांदा भेटली होती. यानंतर त्यांनी संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम हे चित्रपट केले. दोघांचे ९ वर्षांपर्यंत अफेअर चालले. त्या दोघांनी साखरपुडा सुद्धा केला होता.'
मधुबाला यांचे वडिल अताउल्लाह खान यांना दोघांचे प्रेम मान्य नव्हतं. असं म्हटल जातं की, मधुबाला यांच्या वडिलांमुळेच हे दोघे वेगळे झाले. पण, मधुबाला यांच्या बहिण मधुर यांच्यानुसार यात तथ्य नाही. त्यांच्या मते, एका कोर्ट केसमुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. 'नया दौर' या चित्रपटाची निर्मिती केली जात होती. तेव्हा मधुबाला यांच्या वडिलांनी चित्रपटाचे लोकेशन बदलण्याची मागणी केली. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा (B. R. Chopra) यांनी या प्रस्तावाला नकार दिला. दोघांमधील हा वाद कोर्टात पोहचला. दिलीप कुमार यांनी दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांची बाजू घेतली. अताउल्लाह खान यांना त्यावेळी डिक्टेटर (हुकुमशहा) असं सुद्धा म्हटलं जायचं.
दिलीप कुमार यांनी न्यायालयात दिली प्रेमाची कबुली ( Rose Day Special )
न्यायालयात केसची सुनावणी सुरु होती. या दरम्यान,' मी मधुबालाशी प्रेम करतो आणि तहयात मी प्रेम करत राहिन' असं दिलीप कुमार यांनी भर कोर्टात प्रेमाची कबुली दिली. दिलीप कुमार यांनी बी. आर. चोप्रा यांची बाजू घेतल्यामुळे मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर नाराज झाल्या. या घटनेनंतर दोघांच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार आले आणि अखेर ते वेगळे झाले. या काळात 'मुगल-ए-आजम' या चित्रपटाचे शुटींग सुरु होते. पण, या दरम्यान दोघांनी एकमेकांशी संवाद सुद्धा साधला नाही.
अत्यंत वाईट पद्धतीने दोघांना वेगळं व्हावे लागले. आज ही या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पहाताना प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तेव्हा 'हे दोघे एकत्र आले असते तर' या गोष्टीचा विचार होऊ लागतो. या दोघांना खऱ्या आयुष्यात एकत्र येता आलं नाही. पुढे मधुबाला यांचा अकाली कॅन्सरमुळे मृत्यू देखिल झाला. त्यावेळी मधुबाला यांनी अभिनेता व गायक किशोर कुमार ( kishore kumar ) यांच्याशी विवाह देखिल केला होता. दिलीप कुमार यांनी देखिल नर्गिंस यांच्याशी विवाह केला. पण, त्यांच्या मनात मधुबाला होत्या. अनेक वेळा त्यांनी तसा उल्लेख देखिल केला होता. सर्व रसिकांना तसेच बॉलिवूडला मात्र ही प्रेमकथा सतत आठवत राहिल आणि याचे किस्से असेच सांगितले जातील.