Kantara Rishab Shetty
पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याची कहाणी सांगणाऱ्या 'कांतारा' या चित्रपटाने जगभरात प्रेक्षकांची मने जिकली. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले असून चित्रपटात साकारलेली मुख्य भूमिका आणि दमदार अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून तो बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
कर्नाटकच्या किनारी भागातील तुलुनाडू संस्कृतीवर आणि तेथील लोकांच्या श्रद्धावर आधारित या चित्रपटाचे कथानक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाने मोठे यश मिळविले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? कांताराचे दिग्दर्शन करणाऱ्या ऋषभ शेट्टी याचे मराठी रंगभूमीशी, घाशीराम कोतवाल या नाटकांशी वेगळं नातं आहे. साऊथ सुपरस्टार बनण्यापूर्वी त्याच्या अभिनयाचा पाया मराठी नाटकाने घातला असून मराठीतील 'घाशीराम कोतवाल नाटक ते कांतारा' असा थक्क करणारा प्रवास त्याने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर 'केबीसी'मध्ये उघड केला.
अभिनेता ऋषभ शेट्टी याने 'कौन बनेगा करोडपती' या 'रियलिटी शो'च्या १७ व्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी हॉटसीटवर बसल्यानंतर त्याने महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्याला आपल्या अभियनक्षेत्रातील कारकिर्दीबद्दल विचारले असता त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात 'विजय तेंडूलकर' लिखित 'घाशीराम कोतवाल' या नाटकामुळे झाल्याचे सांगितले.
याबाबत बोलताना तो पुढे म्हणाला, लहानपणापासून अभिनयक्षेत्राकडे ओढ होती. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना थिएटर जॉईन केले. यादरम्यान त्याला विजय तेंडूलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' या मराठी नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. या नाटकाचे कन्नडमध्ये भाषांतर करून त्याने 'घाशीराम'ची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला तत्कालीन युनिव्हर्सिटीकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 'घाशीराम कोतवाल' या नाटकानेच आपल्या अभिनयाचा पाया घातल्याचे त्याने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर उघड केले.