के.के. मेननची नवी वेबसीरिज 'आदर्श बाल विद्यालय' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हिमांक गौर दिग्दर्शित या सीरीजमध्ये एका सरकारी शाळेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकाची कथा विनोदी आणि भावनिक पद्धतीने मांडण्यात आली आहे. अर्चना पूरण सिंह आणि नवीन कस्तुरिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'पंचायत' आणि 'ग्राम चिकित्सालय'सारख्या लोकप्रिय सीरीज नंतर प्राईम व्हिडिओ आणखी एका वेगळ्या विषयावरील वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यावेळी कथा गाव किंवा दवाखान्याची नसून एका सरकारी शाळेची आहे. 'आदर्श बाल विद्यालय' या नव्या कॉमेडी-ड्रामा मालिकेत अभिनेता के. के. मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. के के मेनन यांच्या या वेब सीरीजची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली आहे.
प्राईम व्हिडिओने 'आदर्श बाल विद्यालय'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ही सीरीज २४ जुलैपासून भारतासह जगभरातील प्रेक्षकांसाठी प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत उपलब्ध होणार आहे.
ही सीरीज ज्ञानेश्वर त्रिपाठी या बेफिकीर पण महत्त्वाकांक्षी मुख्याध्यापकाभोवती फिरते. बॉलिवूड अभिनेते के. के. मेनन यांनी ही भूमिका साकारली आहे. केंब्रिजमध्ये आयोजित सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे त्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या शिक्षकांच्या टीमसह शहरातील सर्वात मागासलेल्या आणि कमी निकाल लागणाऱ्या शाळांपैकी एका शाळेत बदल घडवून आणण्याचा निर्धार करतात.
शाळेच्या विकासाच्या या प्रवासात त्यांच्यासमोर अनेक अडथळे उभे राहतात. अपुऱ्या सुविधा, मर्यादित संसाधने, निष्काळजी पालक, ढासळलेली शैक्षणिक व्यवस्था आणि रोजच्या प्रशासकीय समस्यांशी सामना करत ही टीम शाळेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करते.
कोण असतील कलाकार?
'आदर्श बाल विद्यालय'मध्ये के.के. मेनन यांच्यासोबत अर्चना पुरण सिंग, नवीन कस्तुरिया, प्रसन्न बिष्ट, देवेन भोजानी, अजितेश गुप्ता, अन्नपूर्णा सोनी, प्राची शाह आणि अभिमन्यू सिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केले आहे. या सीरिजमध्ये एकूण सात भाग असणार आहेत.
के.के. मेनन यांनी यापूर्वी अनेक गंभीर आणि दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र या वेळी ते विनोदी आणि सामाजिक आशय असलेल्या भूमिकेत दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता अधिक आहे. 'आदर्श बाल विद्यालय' वेबसीरिजमध्ये विनोदी प्रसंगाबरोबरच सामाजिक संदेश प्रेक्षकांसाठी महत्वाचे ठरणार आहे.