gabbar singh casting story amjad khan gabbar sholay salim javed rejected him for his voice
पुढारी ऑनलाईन :
शोले या चित्रपटात गब्बर सिंगची भूमिका साकारणाऱ्या अमजद खान यांच्या आवाजाला सुरुवातीला चित्रपटाच्या लेखकांनी कमकुवत समजून नाकारले होते. पण हाच आवाज त्यांच्या व्यक्तिरेखेला आजही जिवंत ठेवतो.
हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात जर एखाद्या खलनायकाने नायकांपेक्षा अधिक प्रसिद्धी मिळवली असेल, तर तो अमजद खानच होता. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’मधील त्यांचा गब्बर सिंग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र गंमत म्हणजे, ज्या भरड, कर्कश आणि रांगड्या आवाजाने गब्बर अजरामर झाला, त्याच आवाजाला सुरुवातीला चित्रपटाच्या लेखकांनी नकार दिला होता.
‘शोले’ची कथा लिहिणाऱ्या प्रसिद्ध जोडीने सलीम खान आणि जावेद अख्तर गब्बरला कागदावर अत्यंत भयावह आणि प्रभावी स्वरूप दिले होते. असे सांगितले जाते की, सुरुवातीच्या स्क्रीन टेस्टदरम्यान अमजद खानचा आवाज ऐकून त्यांना वाटले की हा आवाज या व्यक्तिरेखेसाठी योग्य नाही. त्यांना अमजद खानचा आवाज थोडा पातळ आणि नाकातून येणारा वाटला, जो एखाद्या ताकदवान खलनायकाच्या अपेक्षित जड आवाजापेक्षा वेगळा होता. मात्र दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी त्या आवाजातील वेगळेपण ओळखले आणि अमजद खानला संधी दिली. संवादफेक, थांबे (पॉज) आणि व्यक्तिमत्त्वावर काम करण्याची. इथूनच गब्बर सिंगच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.
अशी केली होती तयारी
अमजद खान यांनी गब्बरचा आवाज फक्त उंच किंवा दमदार करण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यात एक विचित्र, क्रूरता मिसळली. “कितने आदमी थे?”, “अरे ओ सांभा…” आणि “जो डर गया, समझो मर गया” या संवादांमधील त्यांचा ठहराव, शब्द चावून-चावून बोलण्याची शैली आणि अचानक उसळणारं हसणं या सगळ्यांनी गब्बरला भयानक आणि अविस्मरणीय बनवलं.
ज्याच कारणामुळे सलीम–जावेद यांनी त्यांना आधी नाकारलं होतं, तोच आवाज पुढे गब्बरची ओळख ठरला. जर त्यांचा आवाज इतरांसारखाच असता, तर कदाचित ही व्यक्तिरेखा गर्दीत हरवली असती. अमजद खान यांनी सिद्ध केलं की अभिनय फक्त आवाजाच्या जडपणावर नाही, तर त्या आवाजाचा योग्य वापर करण्याच्या कलेवर अवलंबून असतो.
जेव्हा खलनायक नायकांपेक्षा मोठा ठरला
‘शोले’मध्ये अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांसारखे मोठे नायक असतानाही, गब्बरचा प्रभाव इतका खोलवर रुजला की तोच चित्रपटाचा सर्वाधिक चर्चेतला चेहरा बनला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गब्बरचे संवाद दैनंदिन भाषेचा भाग झाले. दशकानुदशके उलटून गेल्यानंतरही गब्बरचे आसुरी हसणं आणि त्याची शैली आजही लोक नक्कल करतात.
अमजद खानचा आवाज ठरला अविस्मरणीय
फार कमी लोकांना माहिती आहे की, अमजद खान यांना ही भूमिका मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला इतर नावांचाही विचार करण्यात आला होता. पण नशिबाने साथ दिली आणि ज्या अभिनेत्याच्या आवाजाला आधी कमजोरी मानलं गेलं होतं, त्यालाच मंच मिळाला. तोच आवाज पुढे हिंदी सिनेमातील सर्वात भीतीदायक आणि लोकप्रिय आवाजांपैकी एक ठरला.
‘शोले’ ठरला टर्निंग पॉइंट
‘शोले’मुळे अमजद खान यांच्या करिअरला नवी दिशा आणि उंची मिळाली. या चित्रपटाने त्यांना केवळ व्यावसायिक यशच दिलं नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही मोठा आधार दिला. रमेश सिप्पी यांचा हा चित्रपट साइन करण्याच्या अगदी आधी अमजद खान अत्यंत कठीण काळातून जात होते. मुलाच्या जन्मावेळी रुग्णालयाचे बिल भरण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. ‘शोले’ने त्यांच्या आयुष्याचा प्रवासच बदलून टाकला.