bollywood tanushree dutta claims film industry forces girls into prostitution give suggestion to new actors
मुंबई : पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री तनुश्री दत्ता ही आपल्या नवनव्या स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. या आधीही तीने बॉलीवूड सिनेसृष्टीवर आरोप केले होते. येथील अनेक दिग्गज लोकांवर तीने आरोप लावले होते. यानंतर आता पुन्हा एकदा तीने फिल्म इंडस्ट्रीबाबत नवे खुलासे केले आहेत.
अभिनेत्री Tanushree Dutta हिने फिल्म इंडस्ट्रीबाबत मोठे खुलासे करत नवोदित कलाकारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सुरुवातीला कलाकारांची खूप स्तुती केली जाते, पण नंतर त्यांना दलदलीत ढकलले जाते, असे ती म्हणाली. तिने वेश्याव्यवसायासंबंधीही गंभीर आरोप केले आहेत.
तनुश्री दत्ता हिने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील काळ्या बाजूचा उल्लेख करत आंधळेपणाने विश्वास ठेवण्याचे धोके सांगितले. नव्या कलाकारांना फसवणूक, शोषण आणि संधीचे आमिष दाखवणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अलीकडेच Meri Saheli या माध्यमासोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिने सांगितले की, अनेक नव्या कलाकारांना सुरुवातीला स्तुती आणि मोठमोठ्या आश्वासनांचे आमिष दाखवले जाते आणि नंतर त्यांना कठीण परिस्थितीत अडकवले जाते.
ति म्हणाली, “कोणी म्हणतो तुम्ही खूप सुंदर आहात, देखणे आहात. पण खरोखर प्रतिभा आहे की नाही, हे कुणालाच माहिती नसते. तरीही कोणी ना कोणी तुम्हाला सांगत असते. तुम्ही हिरो किंवा हिरोईन होणार. चार लोक येऊन तुमची स्तुती करतात आणि नंतर काही लोक तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचाही प्रयत्न करतात. आधी उचलून धरतात आणि नंतर म्हणतात अमुक व्यक्तीला भेटा, तिकडे जा. त्यामुळे खूप संयम ठेवावा लागतो.”
‘फिल्म इंडस्ट्रीतील चॉकलेट वेगळे असते’
तनुश्री म्हणाली की, लहानपणी पालक मुलांना अनोळखी लोकांपासून सावध राहायला शिकवतात, पण मोठे झाल्यावर लोक हे विसरतात.
ति पुढे म्हणाली की, “लहानपणी पालक सांगतात अनोळखी व्यक्तीसोबत जाऊ नका, कोणी चॉकलेट दिले तरी जाऊ नका. पण फिल्म इंडस्ट्रीत ‘चॉकलेट’ वेगळ्या प्रकारचे असते. इथे लोक तुमच्या महत्त्वाकांक्षा, स्वप्ने आणि इच्छांचा फायदा घेतात.”
नव्या कलाकारांना इशारा
या विषयावर बोलण्यामागे उद्देश नव्या कलाकारांना सावध करणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. “मला आज बोलण्याची संधी मिळाली आहे, आणि जर मी चार जणांचेही आयुष्य वाचवू शकले तर ते माझ्यासाठी पुरेसे आहे. अनेक मुलं-मुली स्वप्न घेऊन येथे येतात. त्यांचा वापर केला जातो, त्यांच्यावर अत्याचार होतो आणि शेवटी त्यांना फेकून दिले जाते.”
वेश्याव्यवसायाकडे ढकलले जाण्याचा दावा
शोषणाचे गंभीर परिणाम सांगताना तनुश्री म्हणाली की, काही पीडितांना त्याहूनही वाईट परिस्थितीत ढकलले जाते. ति म्हणाली, “काही लोक शेवटी वेश्याव्यवसायात जातात, कारण त्यांच्यावर इतका अत्याचार झालेला असतो की त्यांना त्या मार्गावर ढकलले जाते. काही जण इतके मानसिकदृष्ट्या खचतात की ते आपल्या गावाला परत जातात.” तनुश्रीच्या मते अशा घटना क्वचितच सार्वजनिक होतात, कारण इंडस्ट्रीमध्ये फक्त यशोगाथाच समोर आणल्या जातात.
एका अभिनेत्रीशी मैत्री संपवली
तनुश्रीने असेही सांगितले की, इंडस्ट्रीतील तडजोडी योग्य ठरवणाऱ्या एका अभिनेत्रीशी त्यांनी मैत्री तोडली होती. ति म्हणाली, “मी तिला सांगितले, मला एखाद्यावर प्रेम झाले आणि मी त्याची गर्लफ्रेंड झाले तर तो माझा निर्णय आहे. पण मी माझ्या आयुष्याचा सौदा करणार नाही. मी या व्यवसायाचा भाग नाही, मी मुख्य कलाकार आहे.”