मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आशाजींनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत २० पेक्षा अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली, परंतु त्यांच्या प्रवासातील काही गाणी केवळ संगीतासाठीच नव्हे, तर त्यांच्याशी जोडलेल्या वादांमुळेही ऐतिहासिक ठरली. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे १९७१ मधील ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे अजरामर गीत.
सध्या ‘कल्ट क्लासिक’ मानले जाणारे हे गाणे प्रदर्शित झाले तेव्हा त्याभोवती वादाचे मोठे वलय निर्माण झाले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांचे संगीत आणि आनंद बक्षी यांचे शब्द असलेल्या या गाण्यावर तत्कालीन समाजात तीव्र टीका झाली होती. गाण्यातील बोल आणि सादरीकरणामुळे हे गीत भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. वादाची धार इतकी तीव्र होती की, त्या काळी हे गाणे आकाशवाणी (रेडिओ) आणि दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यास बंदी घालण्यात आली होती.
देव आनंद आणि जीनत अमान यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात जीनत अमान यांचा ‘हिप्पी लुक’ आणि अंमली पदार्थांचे (चिलम) सेवन करतानाचे दृश्य दाखवण्यात आले होते. या दृश्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ओढली जाईल आणि हे गाणे अमली पदार्थांच्या संस्कृतीचे उदात्तीकरण करत आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला होता. या गाण्याने भारतीय मूल्यांना धक्का लावल्याची भावना त्यावेळी व्यक्त केली गेली.
विशेष म्हणजे, ज्या गाण्यावर नशेला प्रोत्साहन देण्याचा आरोप झाला, त्या चित्रपटाची मूळ कथा मात्र व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर भाष्य करणारी होती. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली तरुण पिढी आणि त्यातून उद्ध्वस्त होणारी कुटुंबे यांचे वास्तव चित्रण करण्यात आले होते. देव आनंद यांनी आपल्या बहिणीला या व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केलेला संघर्ष ही या चित्रपटाची मुख्य संकल्पना होती.
कालांतराने प्रेक्षकांचा दृष्टीकोन बदलला आणि ज्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी झाली होती, तेच गाणे बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय गीतांपैकी एक ठरले. आज अनेक दशकांनंतरही नवीन पिढीमध्ये या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या या धाडसी आणि प्रयोगशील गायकीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळत आहे.