मुंबईत झालेल्या वेलकम टू द जंगल या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमारने आपल्या करिअर, मानधन आणि निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली.
चित्रपटासाठी त्याने केवळ १.७ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. मात्र, या अफवांना अक्षय कुमारने स्पष्टपणे फेटाळून लावले. त्याने सांगितले की, या चित्रपटाशी जोडले जाण्याचे कारण आर्थिक नव्हते, तर त्याची कथा होती. ही कथा दिवंगत लेखक-दिग्दर्शक नीरज वोरा यांनी लिहिल्याचे त्याने नमूद केले. कॉमेडीच्या क्षेत्रात स्वतःला घडवण्यात प्रियदर्शन, राजकुमार संतोषी आणि नीरज वोरा यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याशी असलेल्या अनेक वर्षांच्या नात्याचाही उल्लेख केला. संघर्षाच्या काळात त्यांच्याकडे जात असल्याच्या आठवणींना उजाळा देत त्याने जुन्या दिवसांचे स्मरण केले.
निवृत्तीच्या विषयावर बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, कधीकधी पहाटेच्या शांत वेळेत कामातून दूर होण्याचा विचार मनात येतो. मात्र, काही क्षणांतच शेकडो लोक त्याच्या कामावर अवलंबून असल्याची जाणीव होते आणि ते पुन्हा कामाकडे वळतात. गेली अनेक दशके हा विचार मनात येत असला तरी प्रत्यक्षात काम सोडण्याचा निर्णय त्यांनी कधी घेतलेला नाही.
काम थांबवल्यानंतर काय कराल, असा प्रश्न उपस्थित करत त्याने विनोदी अंदाजात इलेक्ट्रीशियन, डॉग वॉकर किंवा माळी बनण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, निष्क्रिय राहण्यापेक्षा काम करत राहणेच अधिक योग्य वाटते, असे त्यांनी सांगितले.
कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असलो तरी काही दिवसांतच घरचे लोक पुन्हा कामावर कधी जाणार, अशी विचारणा करतात, असेही त्याने हसत सांगितले. ‘निवृत्ती’ हा शब्दच आपल्याला फारसा पटत नसल्याचे नमूद करत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने सक्रिय राहून काम करत राहावे, असा संदेश त्याने दिला.