पुढारी ऑनलाईन
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत लगीनघाई सुरु झालीय. बऱ्याच दिवसांपासून अभिषेक ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. 'आई कुठे काय करते' या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात आहे. अनघा आणि अभिषेकचा पारंपरिक लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
कलाकारासाठी एखादी व्यक्तिरेखा साकारणं म्हणजे परकाया प्रवेशच असतो. ती व्यक्तिरेखा ते फक्त साकारत नाहीत तर जगतातही. असाचा काहीसा अनुभव सांगितला आहे अनाघा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने.
मालिकेतला लग्नाचा प्रसंग साकाराताना अश्विनी महांगडे भावूक झाली होती. काही महिन्यांपूर्वीच तिने तिच्या वडिलांना गमावलं. लेकीचं लग्न पहावं अशी त्यांची इच्छा होती मात्र ती अपूर्ण राहिली. मालिकेत जेव्हा कन्यादान आणि सप्तपदीचा प्रसंग शूट होत होता तेव्हा अश्विनी भावूक झाली होती. वडिलांचे शब्द तिला आठवत होते.
योगायोगाने अश्विनीच्या वडिलांचं आणि मालिकेतील वडिलांचं नावही प्रदीप आहे. त्यामुळे प्रदीप हे नाव जेव्हा जेव्हा कानावर पडतं तेव्हा मला बाबा आठवतात असं अश्विनी म्हणाली. अनघा ही व्यक्तिरेखा मी फक्त साकारत नाहीय तर ती जगते आहे. त्यामुळे अनघाचं आयुष्य सुखी व्हावं अशी इच्छा माझी सुद्धा होती.
घटस्फोटीत स्त्रियांकडे पहाण्याचा समाजाचा वेगळा दृष्टीकोन असतो; पण त्यांनाही जगण्याचा हक्क आहे. आयुष्यातला एखादा निर्णय चुकला म्हणून संपूर्ण आयुष्यच चुकीच ठरत नाही. त्यामुळे अनघाचं लग्न समाजातील अनेक अनघांसाठी आशेचा नवा किरण असेल.
या मालिकेच्या निमित्त्ताने मनोरंजनासोबतच एक चांगला आदर्श उभा करण्याचा आम्ही सर्वच प्रयत्न करत आहोत. अनघा आणि अभिषेकचं लग्न व्हावं ही प्रेक्षकांची इच्छा होती जी आता पूर्ण होणार आहे. लग्नातला प्रत्येक सिक्वेन्स आम्ही खूप मेहनतीने शूट केला आहे. प्रत्येकाच्या लूकवर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे.
देशमुख कुटुंबातला हा अनोखा विवाहसोहळा मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. रात्री ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
हेही वाचलं का?