मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क – कमलकांत आणि कविता मुंबईतील श्रीमंत आणि मध्यमवयीन जोडपे. २० वर्षांच्या संसारात त्यांना एक तरुण मुलगी आणि मुलगा आहे. कमलकांत दिवसभर व्यवसायात गुंतलेले आणि कविता त्यांच्याच बिल्डिंगमधील हितेशच्या प्रेमात अखंड बुडालेली. यातून कमलकांत आणि कविता यांच्यात रोज भांडणे व्हायची. शेवटी कविता आणि हितेशने ठरवले 'अनैतिक संबंधात अडथळा आणणार्या कमलकांतचा काटा काढायचा आणि आपण एकत्र राहायचे.' (Santacruz poisoning case) हा खुनाचा प्रकार मतीगुंग करणारा आहे. हिंदीच काय तर अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांनाही लाजवेल अशा कटाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
ठरलेल्या प्लॅननुसार, कविता कमलकांतच्या जेवणातून दररोज विष देऊ लागली. हे विष होते आर्सेनिक आणि थॅलियम. हे दोन्ही रसायनं घातक आहेत; पण यांच्यामुळे लगेच मृत्यू होत नाही. शरीरात हळूहळू विष भिनेल तशी प्रकृती बिघडू लागते. नंतर हळूहळू सर्व अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवतो. कविता आणि हितेशला असे वाटले होते की, आपण रचलेला कट एकदम परफेक्ट आहे. कमलकांतला आपणच विष देत होतो, हे कुणाला कळणारच नाही. पण, तसे झाले नाही. मेडिकल रिपोर्ट आणि बहिणीच्या साक्षीमुळे कविता आणि हितेश गजाआड झाले.
आपला गुन्हा कधीच उघडकीस येणार नाही, असे गुन्हेगारांना वाटत असते. पोलिसांचे हात आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी गुन्हेगार त्यांचे डोके लढवतात. पण गुन्हा करताना ते काही ना काही सुगावा मागे सोडतातच. तपासाअंती पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचतात, हे या प्रकरणातून पुन्हा दिसून आले आहे.
कमलकांत सांताक्रुझ येथील राहिवाशी. त्यांचा आणि कविताचा विवाह २००२ला झाला होता. त्यांना १९ वर्षांची मुलगी आणि १७ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये हितेश जैनही राहतो. हितेशची आणि कमलकांतची चांगली ओळख होती. पण नंतर कविता आणि हितेश यांच्यात प्रेमसंबंध जुळले. गेली दहा वर्षं त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कविता आणि कमलकांत यांच्यात दररोज भांडणे होऊ लागली.
कमलकांत यांची प्रकृती गेल्या काही महिन्यात सातत्याने बिघडत होती. २७ ऑगस्टला त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अंधेरी येथील क्रिटीकेअर या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती जास्तच बिघडू लागल्याने त्यांना ३ सप्टेंबरला बाँबे हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. येथे १९ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला. बाँबे हॉस्पिटलने मृत्यूची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान कमलकांत यांच्या बहिणीने पोलिसांची भेट घेतली आणि कमलकांतचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यात काही तरी गडबड आहे, अशी माहिती दिली. कमलकांत यांच्या आई सरलाताई यांचा मृत्यू २ ऑगस्टला झाला होता, त्यांनाही कमलकांत सारख्याच प्रकृतीच्य तक्रारीहोत्या, असेही बहिणीने सांगितले. दरम्यान पोलिसांनी बाँबे हॉस्पिटलमधून कमलकांत यांचे सगळे रिपोर्ट मागवून घेतले. कमलकांत यांच्या शरीरात आर्सेनिक आणि थॅलियमचे अंश जास्त प्रमाणात सापडल्याचे मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणात अधिक तसाप करून तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे कविता आणि हितेश यांना अटक केली. (Santacruz poisoning case)
दक्षिण मुंबईतील एका पुरवठादाराकडून हितेश आणि कविता यांना आर्सेनिक आणि थॅलियम सँपल म्हणून मिळवले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आम्ही फार्मसीचा व्यवसाय करतो. आम्हाला मोठ्या प्रमाणावर आर्सेनिक आणि थॅलियम लागणार आहे, असे सांगून हे सँपल हितेश जैन याने मिळवल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
कमलकांत यांच्या आईचा मृत्यू वार्धक्याने झाला असेल, असे कुटुंबीयांना वाटले होते. पण, आता त्यांच्या मृत्यूचाही तपास होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
हा खुनाचा प्रकार मतीगुंग करणारा आहे. हिंदीच काय तर अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांनाही लाजवेल अशा कटाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. कमलकांत यांच्या रक्तात जास्त प्रमाणावर थॅलियम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबातील सर्वांचीच रक्त तपासणी करण्याचा सूचना केल्या. घरातील सर्वांनी रक्ताची चाचणी केली. पण कविता यांनी एक आठवडा ही चाचणी टाळली. या काळात थोड्या प्रमाणात तिने थॅलियम घेतले यानंतर मग रक्ताची चाचणी केली. त्यामुळे कविता यांच्या रक्ताच्या चाचणीतही थॅलियम आढळले. कोणाला शंका येऊ नये यासाठी कविताने ही शक्कल लढवली होती, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. (Santacruz poisoning case)
या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला होता आणि हितेशला ऑक्टोबर महिन्यात चौकशीसाठी बोलवले होते. या तणावात त्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.
हेही वाचा