राखून ठेवा गुलाल (Pudhari File Photo)
संपादकीय

Election Strategy | राखून ठेवा गुलाल

मित्रा, राजकारणात सध्या जे काय चालू आहे, ते कशासाठी असे तुला वाटते?

पुढारी वृत्तसेवा

अरे दादा, अत्यंत सोपे आहे. राजकारणात जे काय होत असते, ते केवळ गुलाल उधळण्यासाठी होत असते. गुलाल उधळण्याचा अर्थ निवडून येणे हा आहे. बरेच लोक आयुष्यभर सतत निवडणुका लढवत राहतात; परंतु त्यांच्या नशिबामध्ये गुलालयोग नसल्यामुळे ते कधीच निवडून येत नाहीत. आता नगरपरिषदेचे उदाहरण घे. समजा एखादा उमेदवार पराभूत झाला, तर त्याला मागच्या दाराने म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून घेता येते. निवडून आल्यानंतर गुलाल उधळला जातो; पण स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमणूक झाल्यानंतर गुलाल उधळला जात नाही.

समजले मला; पण मला एक सांग, उद्या मतमोजणी होणार होती. ती लांबणीवर पडल्यामुळे आणून ठेवलेल्या गुलालाचे काय करायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना नक्कीच पडला असेल. अरे, कार्यकर्ते कशाला गुलाल आणून ठेवतील? गुलाल उमेदवाराच्या खर्चानेच आणला जातो. ज्या उमेदवाराला आपण खात्रीने निवडून येऊ, असा विश्वास असतो, ते आधीच गुलाल आणून ठेवतात.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे निकाल वजन काट्याप्रमाणे खाली-वर होत असतात. कोणी 200 ने पुढे, कोणी 50 ने मागे असे प्रकार होत असताना गुलाल आणून ठेवण्याची रिस्क कोणीच घेत नाही. गुलाल ऑर्डर करून ठेवला जातो आणि आपण निवडून येणार अशी शक्यता दिसताच मिरवणुकीची तयारी केली जाते. यावर्षी निवडणुकांची मतमोजणी अचानक पुढे ढकलली गेल्यामुळे आणून ठेवलेला गुलाल किंवा गुलालाचे पोते तसेच आणखी काही दिवस सांभाळून ठेवावे लागणार आहेत.

ते ठीक आहे रे! पण, यावर्षी निवडणुकाच पुढे ढकलणे किंवा मतमोजणीची तारीख बदलणे असे आजवर न झालेले प्रकार झालेले आहेत.

हे बघ निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असते. त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असतो. क्वचित प्रसंगी न्यायालय निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकते. काही निकालांचा परिणाम पुढे होणार्‍या निवडणुकांवर होईल, असे न्यायालयाला वाटल्यामुळे त्यांनी मतमोजणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असणारी धास्ती पण पुढे ढकलली गेली आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते बिचारे प्रचार करून थकलेले असतात. त्यांना दोन-तीन आठवड्यांचा आराम मात्र निश्चित मिळणार आहे.

शिवाय जिंकून येण्याची किंवा पराभूत होण्याची मानसिकता तयार होण्यासाठी वेळ लागतोच ना? तो मात्र या वेळेला मिळाला आहे, असे म्हणता येईल. जाऊ दे. आपल्याला काय करायचे आहे? आपण सामान्य जनता. जे जे होईल ते पाहत राहणे आपल्या हातात आहे. मतदान करून झाले असेल, तर आपले कर्तव्य आपण पार पाडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT