उमेश कुमार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी 17 ऑगस्ट रोजी बिहारमधील सासाराम येथून महत्त्वाकांक्षी ‘व्होटर अधिकार यात्रे’ला सुरुवात केली आहे. 16 दिवसांची ही यात्रा 1 सप्टेंबर रोजी पाटण्यात संपणार असून, यादरम्यान सुमारे 1300 किलोमीटरचा प्रवास करत, बिहारमधील 20 हून अधिक जिल्हे आणि 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांना भेट दिली जाईल. ही यात्रा केवळ मतदार अधिकार, सामाजिक न्याय आणि आर्थिक समानता यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न नाही, तर तिचा बिहारच्या गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणांशीही खोलवर संबंध आहे.
जातीय समीकरणे आणि आघाड्यांची रणनीती प्रत्येक निवडणुकीचे भवितव्य ठरवत असलेल्या बिहारमध्ये राहुल गांधी यांची यात्रा एक महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल मानले जात आहे. त्यांची यात्रा सासारामपासून सुरू होऊन बिहारच्या दक्षिण, उत्तर आणि मध्य भागांना जोडेल. रोहतास जिल्ह्यातील सासाराम हे बिहारच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे. रोहतास जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहेत, जिथे मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यात राहिली आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने येथे चेनारी आणि कारगहर या केवळ दोन जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी चेनारीमध्ये मुरारी प्रसाद गौतम यांनी विजय मिळवला होता. रोहतास नंतर यात्रा औरंगाबादकडे वळेल, जिथे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. हा भाग राजद आणि जनता दल युनायटेड (जदयू) यांच्या प्रभावाखाली मानला जातो. 2020 मध्ये काँग्रेसने येथे औरंगाबाद आणि कुटुंबा या दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. हे यश यात्रेसाठी एक मजबूत आधार प्रदान करते.
पुढे ही यात्रा नवादा (5 जागा) आणि गया (10 जागा) या भागातून जाईल. नवादावर राजदचा प्रभाव असला, तरी काँग्रेसने हिसुआची जागा जिंकली होती. गयामध्ये जदयू, हिंदुस्तानी अवाम मोर्चा (हम) आणि राजदचे वर्चस्व आहे. यानंतर यात्रा मुंगेरला (3 जागा) पोहोचेल, जिथे काँग्रेसने जमालपूरमध्ये विजय मिळवला होता. मुंगेरमधून राहुल गांधी भागलपूरकडे (7 जागा) जातील, जिथे काँग्रेसची स्थिती तुलनेने चांगली आहे. त्यानंतर कटिहार (7 जागा), पूर्णिया (7 जागा), अररिया (6 जागा), सुपौल (5 जागा), दरभंगा (10 जागा), सीतामढी (8 जागा), मुझफ्फरपूर (11 जागा), पूर्व आणि पश्चिम चंपारण (21 जागा) यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून प्रवास करत यात्रा पाटण्यात समाप्त होईल. 200 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांना स्पर्श करणारी ही यात्रा काँग्रेसला आपला संदेश व्यापक स्तरावर पोहोचवण्याची संधी देईल.
2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 125 जागा जिंकल्या होत्या, तर महागठबंधनला (राजद, काँग्रेस, आदी) 110 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने 70 जागा लढवून केवळ 19 जागा जिंकल्या होत्या, ज्यामुळे पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही यात्रा पक्षासाठी कलाटणी देणारी ठरू शकते. यात्रेदरम्यान राहुल गांधी दलित, मुस्लिम, मागासवर्गीय आणि तरुण मतदारांशी थेट संवाद साधतील, ज्यामुळे काँग्रेससाठी नवीन समर्थक वर्ग तयार होऊ शकतो. रोहतास, औरंगाबाद, भागलपूर आणि कटिहार यांसारख्या भागांमध्ये, जिथे काँग्रेसने पूर्वी विजय मिळवला आहे, तिथे यात्रेमुळे पक्षाच्या मतांची टक्केवारी 5-10 टक्क्यांनी वाढू शकते. ‘भारत जोडो यात्रे’च्या यशानंतर, ही यात्रा देखील जनतेमध्ये भावनिक संबंध निर्माण करू शकते. जर यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला, तर काँग्रेसला बिहारमध्ये राजदच्या छायेतून बाहेर पडून स्वतंत्र आणि मजबूत ओळख निर्माण करता येईल. यात्रेची सर्वात मोठी चिंता मित्रपक्ष असलेल्या राजदसाठी आहे. 2020 मध्ये राजदने 75 जागा जिंकून आघाडीचे नेतृत्व केले होते. राहुल गांधी यांची यात्रा राजदच्या प्रभावक्षेत्रातून जाणार असल्याने आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जागावाटपावर पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते, ज्यात काँग्रेस अधिक जागांची मागणी करू शकते. तथापि, आघाडीत दुरावा दिसू नये म्हणून राजद नेते तेजस्वी यादव हे देखील काही ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी होणार आहेत.
एनडीए, ज्यात भाजप, जदयू, लोजपा (आर) आणि हम यांचा समावेश आहे, त्यांना या यात्रेमुळे मध्यम स्वरूपाचे नुकसान होऊ शकते. चंपारण्य, भोजपूर आणि रोहतास हे भाजपचे गड मानले जातात. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे विरोधी ऐक्य वाढू शकते, जे एनडीएसाठी आव्हान ठरू शकते. भाजप या यात्रेला ‘बाहेरच्या नेत्याची यात्रा’ म्हणून प्रचारित करू शकते. जदयूला भाजपपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिमा काहीशी कमकुवत झाली आहे. एआयएमआयएम, सीपीआय(एमएल) आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) यांसारख्या लहान पक्षांना यात्रेचा अप्रत्यक्ष फटका बसू शकतो. राहुल गांधी यांची यात्रा धर्मनिरपेक्ष मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करू शकते, ज्यामुळे एआयएमआयएमच्या मुस्लिम मतपेढीवर परिणाम होऊ शकतो.
राहुल गांधी यांची ‘व्होटर अधिकार यात्रा’ ही बिहारच्या राजकारणातील एक धोरणात्मक खेळी आहे, जी 2025 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहे. या यात्रेचा उद्देश केवळ काँग्रेसचा मतदारसंघ मजबूत करणे नाही, तर पक्षाला राजदच्या छायेतून बाहेर काढून स्वतंत्र ओळख देणे हा देखील आहे. यात्रेचे सकारात्मक पैलू म्हणजे काँग्रेसला ग्रामीण आणि शहरी दोन्ही मतदारांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. विशेषतः दलित, मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजात राहुल गांधी यांचा संदेश प्रभावी ठरू शकतो. तथापि, यात धोकेही आहेत. जर यात्रेला अपेक्षित गर्दी जमली नाही किंवा एखादा वाद निर्माण झाला, तर ते काँग्रेससाठी नुकसानकारक ठरू शकते. येणारा काळच ठरवेल की, ही यात्रा काँग्रेससाठी संजीवनी ठरते, की केवळ एक राजकीय प्रयोग!