पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना काळात सर्वांनी सलोखा, एकजूट दाखवली. महापुरावेळी भेदभाव न करता माणुसकी जपत लोकांना मदत केली. हा विचार कोल्हापूर पुरता मर्यादीत न ठेवता राज्यात आणि देशात गेला. असे असताना कोल्हापुरात दंगल घडली की घडवली, हे बघण्याची गरज सरकार आणि प्रशासनाला आहे, असे आमच्या सर्वांचे मत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज (दि.१०) येथे दिली. रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Kolhapur News)
कोल्हापुरात दंगल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी उशीरा येत असतील. दंगल होण्याची शक्यता असताना पोलिसांना लागणारी आवश्यक वाहने जर नसतील, तर यामागे शासनाचे काही तरी चुकत आहे. त्यामुळे ही दंगल घडली की घडवली., हे तपासण्याची गरज आहे. दंगलीत सामन्य लोकांचे घर जळते, दुकान जळते, कुटुंब उद्ध्वस्त होते, असे पवार (Kolhapur News) म्हणाले.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याला जर धमकी येत असेल, तर राज्यातील सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अपहरण, बलात्कार, खून, दरोडा या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजची परिस्थिती बघता राज्यात प्रेसिंडेंट रूल कसा आणता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. राज्यात नोकऱ्या, महागाईबाबत कुणी बोलत नाही. भाजप संविधानाच्या विरोधात लोकांना भडकावत आहे. चुकीचा विचार पसरवत आहे, असा आरोप करून पवार यांनी भाजपच्या या विचारांना कर्नाटकात धुडकावून लावल्याचे सांगितले. खोट्य बातम्यांवर छोट्या विचारांचे छोटे नेते बोलत आहेत. तुमची झोप उडेल, हे नक्कीच आमचे कार्यकर्ते बघून घेतील, असा इशारा पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.
महाराष्ट्राचे नेतृत्व बदलण्याच्या दिशेने राज्यात हालचाली सुरू आहेत. निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकांची मनमानी सुरू झाली आहे. राज्यातील सरकार महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका घेते की, नाही, असा प्रश्न पडला आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने कामे थांबली आहेत,असे पवार म्हणाले.
निवडणुकीच्या काळात राजकारण करावे. इतर वेळी सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून समाजकारण करावे, सर्वसामान्य लोकांना मदत करावी. आपल्या विचाराशी प्रमाणिक राहावे, अशी शिकवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. शरद पवारांनी पक्षाला एक दिशा दिली आहे. कुठलाही निर्णय घेत असताना दीर्घकालीन फायदा लक्षात घेऊन घ्यावा, त्यानुसार आम्ही सर्वजण काम करत आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन यापुढील सर्व निवडणुका लढवल्या जातील. काळ बदलतोय. युवकांना दिशा देण्याची गरज आहे. या पुढील काळात मोठे बदल होतील. युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा