शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. 'साखर कारखानदाराला वाचवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बळी देण्याचा घाट एफआरपीवरुन केंद्र व राज्यसरकारने घातला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची बाजू घेणारे शरद पवार आता मोदींची भाषा बोलत आहेत. पवारांची भूमिका अशी असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे पहायचे?' असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, 'सरकारचा हा शेतकरी विरोधी मनसुबा आम्ही कदापीही प्रत्यक्षात येवू देणार नाही असा आमचा निर्धार आहे.'
राजू शेट्टी यांनी आपत्तीने घायाळ झालेल्या शिवारातील आक्रोश सांगण्यासाठी तसेच परमेश्वाराने एकरकमी एफआरपी देण्याची सुबुध्दी सरकारला द्यावी यासाठी जागर एफआरपीचा व आराधना शक्तीपीठाची यात्रा असल्याचे सांगितले व यात सत्याचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. निती व कृषीमुल्य आयोगाने एफआरपीची रक्कम तीन टप्पयांत देण्यासंदर्भात शिफारस केली आहे. महाराष्ट्र शासनानेही त्यास अनुकुलता दर्शवली आहे. साखर कारखानदारांचे म्हणणे ऐकले आहे शेतकऱ्याचे नाही.
यात एकप्रकारे दोन्ही सरकारकरवी शेतकऱ्यांचा विश्वासघातच झाला आहे तथापि सरकारचे हा शेतकरी विरोधी कट आम्ही वास्तवात येवू देणार नसल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यात अतिवृष्टी अन महापुराने शेतकऱ्याचा घास हिरावला आहे. एकप्रकारे ही राष्ट्रीय आपत्तीच आहे. अशावेळी राज्यासह केंद्र सरकारनेही बाधितांना तत्काळ मदत दिली पाहीजे.
पश्चिम महाराष्टारातील जुलै महिन्यातील आपत्तीची पहाणी करण्यासाठी आक्टोबर महिन्यात केंद्राचे पथक आले. हे पहाता मराठवाड्यातील आपत्तीच्या पहाणीसाठी ते मार्च मध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला शेट्टी यांनी केंद्रसरकारला लगावला. पत्रकार परिषदेस रविकांत तुपकर, प्रकाश पोपळे, सत्तार पटेल, अॅड विजय जाधव अरुण कुलकर्णी, माणिक गायकवाड, महारुद्र चौंडे, बालाजी शिंदे आदिंची उपस्थिती होती.