Chinchwad Mohannagar woman death
पिंपरी : अवघ्या तीन दिवसांवर मुलाचे लग्न... दारावर तोरणे झळकत होती, स्वयंपाकघरात लग्नाच्या जेवणाचा सुगंध दरवळत होता आणि घरात पाहुण्यांच्या हसऱ्या गप्पांचा गजबजाट होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच लिहिल होते. लग्नाच्या तयारीत सुरू असलेल्या धावपळीतच पाण्याच्या टाकीत पडून वरमाई म्हणजेच नवऱ्या मुलाच्या आईचा मृत्यू झाला. आनंदात न्हाऊन निघालेले गवळी कुटुंब एका क्षणात शोकसागरात बुडाले. चिंचवड येथील मोहननगर परिसरात शुक्रवारी (दि. ३१) सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली.
आशा संजय गवळी (५२, रा. मोहननगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या वरमाईचे नाव आहे.
आशा गवळी या गृहिणी होत्या. तर त्यांचे पती पुण्यातील शाळेत कर्मचारी आहेत. मूळ इंदापूर तालुक्यातील असलेल्या गवळी दांपत्याने दोन्ही मुलांना इंजिनिअर बनवण्यासाठी आयुष्यभर झगडत संसार उभा केला. मोठा मुलगा संसारात स्थिरावला असून त्याला एक मुलगाही आहे. धाकट्या मुलाचे लग्न येत्या ४ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार होते, तर ३ नोव्हेंबरला साखरपुडा ठरला होता. घरात धार्मिक विधी सुरू होते; पाहुण्यांची ये-जा, खरेदी, कपडे-दागिन्यांची तयारी यामुळे वातावरण उत्साहाने भारलेले होते.
दरम्यान, शुक्रवारी देवीचा वार असल्याने घरात ‘सुवासिनींचे जेवण’ ठेवण्यात आले होते. स्वयंपाकाची लगबग सुरू असतानाच पाण्याची टंचाई जाणवली. त्यामुळे वरमाई आशा गवळी या पाण्याची बादली भरायला टाकीजवळ गेल्या. झाकण उघडून बादली टाकताना त्यांचा तोल गेला आणि त्या टाकीत पडल्या. काही वेळानंतर नवऱ्या मुलाला आई दिसत नसल्याने त्याने शोध घेण्यास सुरुवात केली. टाकीचे झाकण उघडे दिसल्याने मनात शंका आली. आत डोकावल्यावर समोर आईचे निष्प्राण शरीर दिसले. हे दृश्य पाहताच बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झालेल्या मुलाने अक्षरशः टाहो फोडला. “आई... उठ ना... माझं लग्न आहे...” असा हंबरडा फोडत तो खाली बसला. शेजाऱ्यांनी धाव घेत आशाताईंना बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची बातमी पसरताच मोहननगर परिसर शोकमग्न झाला. आयुष्यभर ज्यांनी मुलांच्या भवितव्यासाठी संसाराची प्रत्येक वीट रचली, त्या आईला आपल्या मुलाच्या कपाळावर मुंडावळ्या बांधलेला पाहायचाही योग आला नाही. लग्नघरातील सजावट उतरवण्यात आली, दिव्यांचा प्रकाश मंदावला आणि रडण्याचे हुंदके अंगणभर घुमू लागले.
वात्सल्याचा सागर कोरडा
नवऱ्या मुलाचे “आई गेली” हे शब्द कानावर पडताच घरात अश्रूंचा पूर आला. मुलाचे हात पिवळे करण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. नियतीच्या निर्दयी फटकाऱ्याने फुलणाऱ्या प्रेमळ संसाराचा पाया हादरला. आशा गवळी यांच्या जाण्याने केवळ एक आई नाही, तर वात्सल्याचा अख्खा सागरच कोरडा पडल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.