तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे शहर आणि स्टेशन भागातील बहुतांश रस्त्यांवर नागरिकांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यात व पदपथावर टाकले आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करणार्या वाहनचालक व पादचारी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. बांधकाम साहित्यामुळे वाहनचालक व पादचार्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंतु तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
बांधकाम साहित्य, खडी, वाळू, स्टील, वीटा आदी रस्त्यांवर ठेवले जात असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यामुळे वाहतूककोंडीतही भर पडत आहे. सध्या तळेगाव शहरात स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव उपक्रम राबविला जात आहे. तरीही काही बांधकाम व्यावसायिक रस्त्यावर बांधकामांचे साहित्य टाकत आहेत. तळेगाव स्टेशन परिसरात जोशीवाडी ते तळेगाव-चाकण महामार्गापर्यंत असलेल्या डीपीरोडवर काही भागात खडी आणि वाळूचे ढीग दिसून येत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. यामुळे परिसराचे विद्रुपीकीरण होत आहे.
वाळूच्या ढिगार्यावर कुत्र्यांचा वावर
तळेगावात अनेक रस्त्यांवर बांधकाम साहित्य, राडारोडा रस्त्यात टाकला जात आहे. या साहित्यावर भटकी कुत्री टोळक्याने येऊन बसतात. यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी, चारचाकी वाहनाने प्रवास करणार्या वाहनचालकांवर तसेच पादचार्यांवर ही कुत्री धावून जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यात पसरलेल्या वाळूवरून दुचाकी घसरुन अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भागातील रस्त्यांवर राडारोडा
इंद्रायणी कॉलनी, आनंदनगर, वनश्रीनगर येथे ठिकठिकाणी रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवलेले दिसत आहे. अगोदरच रस्त्यावर वाहन पार्किंग केल्यामुळे नागरिक त्रासले आहेत. यातच आता रस्त्यांवर बांधकाम साहित्य टाकले जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. अचानक पाऊस आला तर बांधकामासाठी आणलेले साहित्य रस्त्यात पसरून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो यामुळे प्रशासनाने येथील रस्त्यातील अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीस खुला करावा.
उपनगरात रोडवर अनधिकृत वाहन पार्किंग त्रासदायक ठरत आहे. त्यात बांधकाम व्यावसायिक खडी, वाळू, वीट, स्टील आदी बांधकाम साहित्य रोडवर ठेवत आहेत. यामुळे रस्त्याने प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नगर परिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्ता वाहतुकीस खुला करणे गरजेचे आहे.विठ्ठलराव भेगडे, ज्येष्ठ नागरीक