Farmer planting rice
भात लावणी करताना शेतकरी  पुढारी
पिंपरी चिंचवड

मावळ तालुक्यात भात लावणीला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून पश्चिम पट्ट्यातील भात खाचरे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये भात लावणीला सुरुवात झाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लावलेली भातरोपे लागवडीला आली आहेत. पुढील काही दिवसांत तालुक्यातील सर्व भागांत भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

भात खाचरे भरली

मान्सूनचे आगमन तालुक्यात झाले असून, गेली सात ते आठ दिवस तालुक्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने मावळ तालुक्यातील काही गावांमध्ये भात खाचरे पूर्ण भरली असल्याने त्या भागातील शेतकर्‍याने भात लावणीचे काम हाती घेतलेे आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसानंतर काही दिवसांत मान्सूनही आलेला होता.

त्या वेळी मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकर्‍यांनी भातरोपाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर मान्सूनच्या पावसाने भातरोपांची लागवड चांगली झाली होती. आता साधारणपणे त्या ठिकाणी भाताच्या पुनर्लावणीची सुरुवात काही शेतकर्‍यांनी केली असल्याचे प्रगतशील शेतकरी गणपतराव भानुसघरे यांनी सांगितले.

13 हजार हेक्टरवर भात लागवड

मावळ तालुक्यात खरीप भात पिकाचे क्षेत्र सर्वांधिक आहे. या क्षेत्रावर सुमारे 13 हजार हेक्टरपर्यंत भात पिकाची लागवड होते. मावळ तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी संताजीराव जाधव यांनी याबाबत नियोजन केले असून, भात लागवडीसाठी उत्तम पाऊस पडत असल्याचे त्यांनी सांगितले. मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भागात मान्सूनच्या पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

लोणावळा, खंडाळा. कार्ला, कामशेत, पवनानगर, उकसान, खांडी या भागात या पावसाचे प्रमाण जास्त आहे. मावळ तालुक्यातल्या काही प्रगतिशील शेतकर्‍यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडो अथवा न पडो त्यांनी आपल्याकडे असलेल्या पाण्याच्या माध्यमाद्वारे भात पेरणी केली होती. त्याची उगवण चांगली होऊन सध्या लागवडीचे काम त्या त्या शेतकर्‍यांनी सुरू केलेले आहे.

गेला आठवडाभर मावळ तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मान्सूनचा पाऊस चांगला पडत असल्याने भातपिकाला याचा चांगला फायदा होऊन या आठवड्यात भातरोपांची वाढही चांगली झाली. त्यामुळे या आठवड्यामध्ये शेतकरीवर्ग भाताच्या पुनर्लावगडीसाठी जोरदार तयारी करत आहे.

SCROLL FOR NEXT