भोसरी: राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुलाच्या पिलरचा (खांबांचा) वापर उघड्यावर दिवसा लघुशंकेसाठी खुलेआम केला जात असल्याने परिसराला शौचालयाचे स्वरूप आले आहे. यामुळे उड्डाण पुलाखाली प्रचंड दुर्गंधी येत आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाखालील कचरा त्वरित साफ करावा.
तसेच उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. सुरक्षेसाठी तसेच पुलाखाली होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे. भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची निर्मिती महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आली आहे. नागरिकांचा प्रवास सुखकार होण्यासाठी व दररोजची होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरत आहे; परंतु या उड्डाण पुलाचा वापर कचरा टाकणे, लघुशंका, दारूचा रिकाम्या बाटल्या आदी गोष्टीसाठी वापर होत आहे. परिणामी वाहनचालक आणि पादचारी हैराण झाले आहेत.
नाक दाबून करावा लागतोय प्रवास
उड्डाण पुलाखालून दररोज हजारो नागरिक आणि वाहने ये-जा करतात. मात्र, पुलाखालील कचरा आणि दुर्गंधीमुळे पादचाऱ्यांना नाक दाबून चालावे लागत आहे. अनेक वाहनचालक आपली वाहने पुलाखाली पार्क करतात, त्यांनाही या घाणीचा सामना करावा लागत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे आणि उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नगरिकातून संताप व्यक्त होत आहे. या समस्येबाबत अनेकदा प्रशासनाला कळविण्यात आले आहे; परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
बीआरटीचे देखभालीकडे दुर्लक्ष
आरोग्य विभागाचा वतीने परिसराची साफसफाई करण्यात येते. पुलाखालील परिसरात जे बेघर राहतात ते परिसरात अस्वच्छता पसरवित आहेत. उड्डाण पुलाखालील परिसराचा काही भाग प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 7 मध्ये येतो. तसेच याची देखभाल बीआरटी स्थापत्य विभागाकडे आहे. परंतु, त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसराच्या सौंदर्याला बाधा येत आहे.
उड्डाण पुलाचे विद्रुपीकरण थांबवा
'राजमाता जिजाऊ' यांच्या नावाने असलेल्या या उड्डाण पुलाची अशी दुरवस्था होणे अत्यंत संतापजनक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या उड्डाण पुलाचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष घालून परिसराची शोभीकरण करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या नावाने असलेल्या या उड्डाण पुलाखाली एवढी घाण असणे अत्यंत दुर्दैवी आहे. पिलरचा वापर उघड्यावर शौचालयासारखा केला जात आहे. प्रशासनाने येथे सुशोभीकरण करावे जेणेकरून लोक येथे घाण करणार नाहीत. वारंवार सांगूनही महापालिका याकडे लक्ष देत नाहीनागरिक
ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक करण्यात येईल. तसेच विद्रुपीकरण करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येईल.राजेश भाट्ट, सहाय्यक आरोग्य अधिकारी