Sweets Pudhari
पिंपरी चिंचवड

Best Before Sweets: मिठाईचा चकचकाट, पण ताजेपणाचा पत्ता नाही! ‘बेस्ट बिफोर’वर प्रश्नचिन्ह

काही दुकानांत उत्पादन तारीखच नाही; कुठे पाच दिवस तर कुठे महिनाभराची मुदत, शिळ्या-भेसळयुक्त मिठाईच्या विक्रीवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: सणासुदीचे दिवस, धार्मिक कार्यक्रम आणि विविध समारंभांच्या पार्श्वभूमीवर मिठाईला मोठी मागणी वाढली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरातील मिठाईची दुकाने विविध प्रकारच्या आकर्षक मिठाईंनी सजली आहेत. पेढा, बर्फी, काजू रोल, काजू कतली, अंजीर रोल, मोतीचूर लाडू, बेसन लाडू यासह विविध बंगाली मिठाई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, या मिठाईच्या ताजेपणा आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

, ,, , ,, , , ,

विशेष म्हणजे काही मिठाईच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईबाबत 'बेस्ट बिफोर'ची माहितीच उपलब्ध नसल्याचे दिसून येते. तर काही दुकानांमध्ये मिठाईवर पाच दिवसांपासून तब्बल एक महिन्यापर्यंत 'बेस्ट बिफोर'ची मुदत नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नेमकी कोणती मिठाई किती काळ सुरक्षितपणे खाता येते याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आकर्षक रंग, चकचकाट गुणवत्तेचे काय?

ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी मिठाईंना आकर्षक रंग, चकचकाट आणि सजावट केली जाते. रंगीबेरंगी मिठाई पाहून ग्राहक सहज आकर्षित होतात. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणारे रंग खाद्यपदार्थांसाठी मान्यताप्राप्त आहेत का आणि त्यांचा वापर योग्य प्रमाणात करण्यात आला आहे का याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती मिळत नाही.

मिठाई उत्‍पादन तिथी, एक्‍सप्रायरीचा अभाव

मावा, दूध, तूप, सुकामेवा यांसारख्या घटकांपासून तयार होणारी मिठाई योग्य तापमानात आणि योग्य पद्धतीने साठवली न गेल्यास तिच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. मिठाई ताजी आणि आकर्षक दिसत असली तरी ती प्रत्यक्षात किती दिवसांपासून विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. याची खात्री ग्राहकांना होत नसल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिळी मिठाई ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक

शिळी किंवा योग्य पद्धतीने साठवणूक न केलेली मिठाई खाल्ल्यास अन्नातून विषबाधा, पोटदुखी, उलट्या, जुलाब, मळमळ यांसारखे त्रास होऊ शकतात. दूषित अन्नामुळे काही व्यक्तींमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

'बेस्ट बिफोर'ची माहिती कुठे?

मिठाई विक्री करताना ग्राहकांना आवश्यक माहिती स्पष्टपणे उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. मात्र, काही ठिकाणी उघड्या ट्रेमध्ये ठेवलेल्या मिठाईवर निर्मितीची तारीख किंवा 'बेस्ट बिफोर'ची माहिती दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकाला आपण ताजी मिठाई, खरेदी करीत आहोत की आधीपासून ठेवलेली हे समजणे कठीण होते. दुसरीकडे काही दुकानांमध्ये मिठाईवर पाच दिवस, आठवडा, पंधरा दिवस किंवा महिनाभरापर्यंतची 'बेस्ट बिफोर' मुदत नमूद असल्याचे आढळते. मिठाईचा प्रकार त्यातील घटक आणि साठवणुकीच्या परिस्थितीनुसार तिची टिकण्याची क्षमता बदलू शकते. त्यामुळे अशा मुदतीबाबत नियमांचे पालन होत आहे का याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सणासुदीतच तपासणी, वर्षभर कारवाईकडे दुर्लक्ष

मिठाई विक्री केंद्रांची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित अन्नसुरक्षा यंत्रणेची आहे. मात्र सण-उत्सवांच्या काळात काही दिवस तपासणी मोहीम राबवून नंतर परिस्थिती 'जैसे थे' राहू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. शिळी किंवा निकृष्ट दर्जाची मिठाई, नियमबाह्य रंगांचा वापर, अयोग्य साठवणूक तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करावी. शहरातील मिठाई विक्री केंद्रांची अचानक आणि नियमित तपासणी करून मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रंग पाहून नव्हे, माहिती पाहून मिठाई घ्या!

मिठाई आकर्षक दिसते म्हणून ती दर्जेदार असेलच असे नाही. काही दुकानांमध्ये 'बेस्ट बिफोर'ची माहितीच दिसत नाही तर काही ठिकाणी पाच दिवसांपासून महिनाभरापर्यंतची मुदत नमूद आहे. शिळी किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेली मिठाई नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अन्न व औषध प्रशासनाने केवळ सणासुदीपुरती मोहीम न राबवता वर्षभर नियमित तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT