पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आणखी पाणीकपात करण्यात येणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका हद्दीत पुढील काही महिने 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे शहरासाठी 31 जुलैपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाते. यावर्षी पाऊस कमी असल्याने जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेवरून 31 ऑगस्टपर्यंत पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. पाणीकपातीमुळे वाचलेले पाणी शहरवासीयांना पुढील काही महिन्यांत वापरता येणार आहे. पाणीकपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्या संदर्भात विचारले असता आयुक्त बोलत होते.
आयुक्त सूर्यवंशी म्हणाले की, गेल्या सव्वासहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पवना धरणातून तसेच, आंद्रा धरणातील इंद्रायणी नदीच्या निघोजे बंधाऱ्यातून पाणी उचलले जात आहे. जलसंपदा विभागाच्या सूचनेपूर्वीच शहरात पाणीकपात सुरूच आहे. त्यामुळे नव्याने पाणीकपात केली जाणार नाही.
महापालिकेकडून घेतले जाणारे पाणी प्रकिया करून नदी पात्रात सोडले जात नसल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेस दंड लावला आहे. याप्रकारे त्यांनी राज्यातील अनेक महापालिकांना दंड लावला आहे. पाणी शुल्क व दंडाची रक्कम भरण्याची कार्यवाही केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड व अतिक्रमणावर नियमितपणे कारवाई केली जाणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहराच्या ओळखीचा ‘तो’ विषय संपला
पिंपरी-चिंचवड शहराला जगात कोण ओळखते, असा प्रश्न आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केला होता. त्यावरून सत्ताधारी भाजपासह विरोधकांनी आयुक्तांवर टीका केली होती. त्याप्रकरणी आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. महापौर रवी लांडगे यांनी त्यांना सोशल मीडियावर दिलगिरीचा संदेश प्रसारित करण्याबाबत सांगितले होते. त्या संदर्भात विचारले असता आयुक्त म्हणाले की, तो विषय आता संपला आहे.