पिंपरी: प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) पर्यावरण कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. 15 वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांसाठी हा कर अनिवार्य असून, तो न भरल्यास दंडासह व्याज आकारले जाणार आहे. सध्या शहरात आरटीओच्या वायुवेग पथकाची धडक मोहीम सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
आरटीओकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान वर्षभरात 37 हजार 438 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातून 9 कोटी 56 लाख 90 हजार 295 रुपयांचा दंड वसुली करण्यात आली आहे. यावरून शहरात अनेक वाहनधारकांनी पर्यावरण कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
पर्यावरण कर का महत्त्वाचा?:
पर्यावरण कराचा उद्देश केवळ महसूल गोळा करणे नसून, शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हा आहे. जुनी वाहने अधिक धूर व प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करून ती सुरक्षित व पर्यावरणपूरक आहेत की नाही, याची खात्री करून घेतली जाते. हा कर भरल्यानंतर वाहनाला पुढील पाच वर्षांसाठी वाहन वैधता मिळते.
कर न भरल्यास जागेवरच दंड आकारणी
पिंपरी-चिंचवड शहरात आरटीओच्या वायुवेग पथकाने विविध ठिकाणी तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. विशेषतः 15 वर्षांपेक्षा जुनी वाहने लक्ष्य करून त्यांच्याकडून कर वसूल केला जात आहे. या मोहिमेत कर न भरलेल्या वाहनांना तत्काळ नोटीस दिली जाते. जागेवरच दंड आकारला जातो. आवश्यक असल्यास वाहन जप्त करण्याची कारवाईही केली जाते.
कर भरण्याचे आरटीओकडून आवाहन
शहरातील काही वाहनधारक वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे पंधरा वर्षांहून अधिक वर्ष झालेली वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहे. यामुळे होणारे प्रदूषण अधिक आहे. अशा वाहनधारकांना आरटीओकडून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चारचाकी वाहनांकडून अधिक दंड
शहरातील चारचाकी वाहनांकडून सर्वाधिक चार कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हा दंड भरताना वाहनचालकांकडून व्याजासहित रक्कम आकारली असून ती 29 लाख 45 हजार रुपये आहे.
मुदतीपूर्वी कर न भरल्यास काय?
थकीत करावर दर महिन्याला 2 टक्के व्याज आकारणी.
दंडासह एकत्रित रक्कम वसूल केली जाते.
दीर्घकाळ कर न भरल्यास कडक कारवाई होऊ शकते.