पंकज खोले
पिंपरी: औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी कचरा साचल्याचे दृश्य दिसून येते. तसेच, परिसरातील रस्त्यांची वेळेवर साफसफाई केली जात नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. परिणामी, रिकामा प्लॉट, चौकातील पदपथ आणि कॉर्नर हे कचऱ्याचे आगार बनले आहे.
एमआयडीसी परिसरात 15 हजारांपेक्षा अधिक कंपन्या, कारखाने आहेत. येथील कारखान्यांत निर्माण होणाऱ्या घातक कचऱ्यासाठी स्वतंत्र विघटन केंद्राची मागणी आहे; मात्र त्यावर अद्यापही महापालिकेकडून उपाययोजना राबविली जात नसल्याचे उद्योजक सांगतात. त्यामुळे येथील घातक कचरा रांजणगाव येथे नेऊन टाकावा लागतो.
पिंपरी चिंचवड परिसरात कंपन्यामधून वेगवेगळा कचरा निर्माण होतो. मग, तो कागद असो वा प्लास्टिक तसेच, अनेकदा घातक कचरादेखील असतो. इतर कचरा हा महापालिकेच्या वतीने संकलित केला जातो. मात्र, घातक कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था अद्याप महापालिकेकडून करण्यात आलेली नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेला घातक कचरा उद्योजकांना रांजणगाव येथे नेऊन टाकावा लागतो. कचरा आणि घातक कचऱ्याबाबत महापालिका आणि एमआयडीसीमधील कंपन्यांच्या बैठका झाल्या आहेत. मात्र, उद्योजकांना सेवा पुरविणाऱ्या महापालिकेला घातक कचऱ्याचा प्रश्न अद्याप मार्गी लावता आलेला नाही.
घातक कचरा म्हणजे काय?
प्रत्येक कंपनीमध्ये कमी अधिक प्रमाणात घातक कचरा निर्माण होत असतो. तो 5 ते 20 टक्क्यापर्यंत आहे. कागद, काच, प्लास्टिक, पुठ्ठे, तारा या कचऱ्याप्रमाणेच इतर घातक कचरा निर्मित होतो. त्यामध्ये रंगाचे डबे, बॅटरी, वापरलेले ऑइल, हॅण्डग्लोज, ग्रीसचे डबे, तुटलेले बल्ब, रासायिनक ड्रम, कीटकनाशके इत्यादी कचरा; मात्र हा घातक कचरा पालिकेकडून उचलला जात नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
रबर, ई कचरा अन् कापड
शहरातील उद्योगातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक,काच याचे प्रमाण सुमारे 30 टक्के आहे. तर, धातू, रबर, अतिघातक ई कचऱ्याचे प्रमाण 20 टक्के इतके आहे. कंपन्यांत अथवा कारखान्यांच्या वर्कशॉपमध्ये अनेकदा घातक वस्तू या मोठया प्रमाणात असतात. मात्र, या वस्तूची विल्हेवाट लावण्यासाठी उद्योजकांना अडचणी येतात. गेल्या पाच वर्षात तीन आयुक्तांनी घातक कचराची विल्हेवाट लावण्यासाठीच्या उपायोजनांचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अद्यापपर्यंत पूर्ण झाले नसल्याचे उद्योजक सांगतात.
एमआयडीसीत प्रत्येक ब्लॉकमध्ये स्वच्छता ठेवण्यात येते. त्याचा मी स्वतः आढावा घेत आहे. येथील कचरा उचलणाऱ्या वाहनांत चार कप्पे करण्यात येत आहे. त्यात साधा, घातक व अतिघातक असे वेगळा कचरा संकलित केला जातो. तरी, उद्योजकांच्या समस्या आणखी उपयायोजना करण्यात येतील.प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका
एमआयडीसीतील निर्मित कचऱ्याबाबत त्या त्या ठिकाणचा आढावा घेण्यात येत आहे. तक्रारी असल्यास त्या तातडीने सोडविण्यात येतील. याबाबत बैठक घेण्यात येणार आहे.किरणकुमार मोरे, सहायक कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग, महापालिका