पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोट्यवधीचा महसूल मिळवून देणारे आणि शहरातील नागरिकांचे प्रमुख आकर्षण असलेले राजमाता जिजाऊ उद्यान (डायनासोर पार्क) सध्या गैरव्यवस्थापनाच्या विळख्यात अडकले आहे. वीकेंडला कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र तिकिटासाठी रांगा, पार्किंगचा गोंधळ, अपुऱ्या सुविधा आणि ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पार्किंग बनले पथारीवाल्यांचा अड्डा; वाहनचालक त्रस्त
उद्यानाच्या पार्किंग परिसरात पथारी व्यवसायिकांचे वाढते अतिक्रमण मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहन पार्क करण्यासाठी जागा नसल्याने दुचाकीचालक आणि पथारी व्यावसायिकांमध्ये वारंवार वाद निर्माण होत आहेत. पार्किंगवर नियंत्रण नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तिकीट काढण्यातच तास गेला, मग उद्यान पाहायचे कधी?
शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी उद्यानाबाहेर तिकिटासाठी अक्षरशः लांबच लांब रांगा लागतात. तिकीट खिडकीवर पुरेसे नियोजन नसल्याने नागरिकांना तासन्तास उभे राहवे लागते. अनेक कुटुंबांचा उद्यानातील अर्धा वेळ तिकीट काढण्यातच खर्च होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तिकीट खिडकीबाहेर रांगांचे नियोजन करण्यासाठी साधे ग्रील किंवा बॅरिकेड्सदेखील नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
पिण्याच्या पाण्यासाठीही रांग
उद्यानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत अपुरी असल्याचे चित्र आहे. एकाच वॉटर कुलरवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, पाणी पिण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहवे लागत आहे. लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या उद्यानात ही अवस्था असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
व्यवस्थेचा बाेजवारा
महापालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांची भर घालणाऱ्या राजमाता जिजाऊ उद्यानात आजही तिकिटासाठी रांगा, अपुरी पाण्याची व्यवस्था, पार्किंगमधील अतिक्रमण, व्यवस्थेतील त्रुटी कायम आहेत. नागरिकांना सुविधा देण्यापेक्षा केवळ महसूल गोळा करण्यावर भर दिला जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन उद्यानातील गैरव्यवस्थेचा हा 'डायनासोर' संपवणार का की नागरिकांना असाच मनस्ताप सहन करावा लागणार? हा प्रश्न सध्या उद्यानात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात आहे.
या उपाययोजनांची गरज
शनिवार- रविवार व सुटीच्या दिवशी अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करून स्वतंत्र रांगा व बॅरिकेडची व्यवस्था करावी.
उद्यानात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून अतिरिक्त वॉटर कुलर बसवावेत.
पार्किंग परिसरातील पथारीवाल्यांचे अतिक्रमण हटवून वाहनांसाठी जागा निश्चित करावी.
गर्दीच्या दिवशी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी व पार्किंग व्यवस्थापक नियुक्त करावेत.
नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पडेस्क व तक्रार नोंदवही/क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावा.
उद्यानात नियमित स्वच्छता, शौचालये आणि इतर मूलभूत सुविधांची दैनंदिन तपासणी करावी.
उद्यानातून मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळत आहेत की नाही, याचे नियमित ऑडिट करावे.
तिकीट रांगा, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था तसेच पार्किंगमधील अतिक्रमण याबाबत तात्काळ कारवाई केली जाईल. संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी उद्यानातील सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल.महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक, गुलाब पुष्प उद्यान, पिंपरी चिंचवड मनपा
राजमाता जिजाऊ उद्यानात शनिवार, रविवारी मोठ्या संख्येने नागरिक येत असल्याने तिकीट व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि पार्किंगसह मूलभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागणे किंवा पार्किंगमध्ये पथारीवाल्यांमुळे गैरसोय होणे योग्य नाही. महापालिका प्रशासनाने या समस्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. उद्यानातून महापालिकेला मोठा महसूल मिळत असल्याने त्याच प्रमाणात नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे गरजेचे आहे.शशिकांत कदम, नगरसेवक, पिंपळे गुरव.