पिंपळे गुरव: येथील साठ फुटी रोडवरील भाऊनगर परिसरातील फर्निचरच्या गोडाऊनला सोमवारी दुपारी भीषण आग लागली होती. दाट लोकवस्तीच्या मध्यभागी आग लागल्याने काही काळ परिसरात भीती व घबराटीचे वातावरण होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
आगीची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी, रहाटणी उपअग्नी केंद्र तसेच भोसरी येथील पथके तात्काळ दाखल झाली. अरुंद रस्ते व दाट बांधकामांमुळे अडचणी येत असतानाही जवानांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अमर अदियाल यांनी धाव घेतली. शेजारील घरांतील गॅस सिलिंडर बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. तसेच, आग विझवण्यासाठी मदत केली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गोडाऊनच्या समोर आणखी चार गोडाऊन आहेत. त्या गोडाऊनपर्यंत आगीची झळ पोहोचली नाही; अन्यथा नुकसान अधिक वाढले असते.
घटनेनंतर सांगवी पोलिस ठाणे येथील सहायक पोलिस निरीक्षक नारायण पाटील तसेच नवी सांगवी येथील मार्शल राहुल कारंडे व हंसराज लंगर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. तसेच, माहिती मिळताच आमदार शंकर जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी नगरसेवक शशिकांत कदम व रवीना अंघोळकर उपस्थित होते. कर्मचारी विजय घुगे, गौतम इंगवले, शहाजी कोपनर, विशाल फडतरे, तेजस्वी पाटील, स्नेहा जगताप व करुणा थोरात आदी या कारवाईत सहभागी झाले होते.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
संबंधित ठिकाणी एकूण पाच गोडाऊन असून, त्यामध्ये लोखंडी साहित्य, स्क्रॅप, मंडप-डेकोरेशनचे साहित्य, लेझर कटिंग मशीन, ॲक्रेलिक नंबर प्लेटसाठी लागणारे साहित्य तसेच प्लायवुड व फर्निचरचा मोठा साठा होता. प्रारंभी लेझर कटिंग मशीन असलेल्या गोडाऊनमध्ये आग लागली आणि चारही गोडाऊन एकमेकांना लागून असल्यामुळे काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. दाट काळा धूर उसळू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली व घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे परिसरातील अरुंद रस्ते, अनियंत्रित बांधकामे व अग्निसुरक्षा नियमांचे पालन आदी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना राबविण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.