पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील मुख्य आगार म्हणून वल्लभनगर आगाराची ओळख आहे. अस्वच्छता, दुर्गंधी अन् सुविधांची वानवा असलेल्या आगारात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार (दि. 30) वल्लभनगर आगाराला भेट देऊन आगाराची पाहणी केली. मंत्रिमहोदय भेट देणार म्हटल्यानंतर प्रशासनाने एका दिवसात आगार परिसराची केलेली स्वच्छता पाहून प्रवासी थक्क झाले.
राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व परिवहनमंत्री यांनी पिंपरी-चिंचवड आगाराला भेट दिल्यानतंर आगारातील प्रवासी सेवा-सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी चालक-वाहकांच्या समस्यांविषयी चर्चा केली. प्रवाशांना आहोरात्र सेवा देणाऱ्या चालक-वाहक यांना विश्रांतीगृह स्वच्छ ठेवावेत, तसेच त्यांना अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा द्यावी. कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ, शुद्ध पाण्याची सोय करावी असे विविध निर्देश त्यांनी स्थानकातील अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
आगारास मंत्रिमहोदयांनी भेट देणार म्हटल्यानंतर आगार परिसर स्वच्छ करण्यात आला होता. तसेच परिसरातील कचराकुंड्या रिकाम्या करण्यात आल्या. पाणपोईच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे फलक लावण्यात आले होते. एका दिवसात परिसराचा कायापालट झाल्याचे पाहून प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले.