पिंपरी: मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणात तब्बल 93 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो. त्यामुळे पवना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संततधार पावसामुळे पवना धरण गरुवारी (दि. 23) सायंकाळी पाचपर्यंत 93.10 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच, घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. धरणामध्ये कमी व अधिक प्रमाणामध्ये येवा प्राप्त होत आहे.
पवना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता कोणत्याही क्षणी नदीपात्रामध्ये कमी किंवा अधिक प्रमाणात विसर्ग करण्यात येणार आहे. त्याबाबतची आवश्यक माहिती विसर्गापूर्वी जलसंपदा विभागामार्फत देण्यात येईल. सततच्या होणार्या पावसामुळे ओढे व नदी नाल्यांच्या पाणीपातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते.
त्यामुळे पवना नदीकाठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रातील आपले साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप तसेच, जनावरे नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी इतरत्र हलवावीत.
कोणत्याही प्रकाराच्या अफवांना बळी न पडता, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवनानगरातील पवना धरण प्रकल्पाच्या पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
धरणातील गुरुवारी सायंकाळपर्यंतचा पाणीसाठा
पवना - 93.10 टक्के
आंद्रा - 90.12 टक्के
भामा आसखेड - 85.10 टक्के
मुळशी - 84.09 टक्के