नवलाख उंबरे: डिजिटल युगाच्या वेगवान प्रवाहात शिक्षण पद्धतीत मोठे बदल होताना दिसत आहेत. एकेकाळी विविध कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असायची. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की शॉर्टटर्म कॉम्प्यूटर कोर्स करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये मोठी गर्दी होत. परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अनेक संस्था अत्यंत कमी शुल्कात किंवा अगदी मोफत संगणक प्रशिक्षण, कौशल्य विकास कोर्सेस, व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देत असल्याने मार्केटमध्ये असलेल्या प्रशिक्षण केंद्रांवर संक्रांत आली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे सोशल मीडिया आणि ऑनलाइन शिक्षणाची झपाट्याने वाढ हे आहे.
आजच्या पिढीला माहिती आणि शिक्षणासाठी घराबाहेर पडण्याची गरज उरलेली नाही. मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या मदतीने युट्यूब, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि विविध ॲप्सवर हजारो कोर्सेस सहज उपलब्ध होत आहेत. हे कोर्सेस बहुतेक वेळा मोफत किंवा अत्यंत स्वस्त दरात मिळत असल्यामुळे विद्यार्थी त्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. घरबसल्या, आपल्या वेळेनुसार आणि सोयीने शिकण्याची सुविधा मिळत असल्याने पारंपरिक प्रशिक्षण केंद्रांकडे जाण्याची गरज विद्यार्थ्यांना वाटत नाही.
याशिवाय, बाहेर जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी लागणारा वेळ, प्रवासाचा खर्च आणि दैनंदिन धकाधकीतून वेळ काढण्याचा त्रासही विद्यार्थ्यांना टाळायचा असतो. त्यामुळे मोबाईलवर शिकणे हा अधिक सोयीस्कर आणि आकर्षक पर्याय ठरत आहे. विशेषतः ग््राामीण आणि अर्ध-शहरी भागातही इंटरनेट पोहोचल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा प्रभाव अधिक वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीचा परिणाम प्रशिक्षण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक संस्था आर्थिक अडचणीत सापडत आहेत. काहींना बंद पडण्याची वेळ आली आहे.
शिक्षणपद्धतीत होतोय बदल
प्रशिक्षकांनाही आपली पारंपरिक शिकवण्याची पद्धत बदलण्याची गरज जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक प्रशिक्षक आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा वापर करून मोबाईलवर प्रशिक्षण देण्यास सुरुवात करत आहेत. लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ, डिजिटल नोट्स आणि ऑनलाइन टेस्ट्स यांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऑनलाइन शिक्षणाला येताहेत मर्यादा
ऑनलाइन शिक्षणाला काही मर्यादाही आहेत. प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा अभाव, शंका त्वरित निरसन न होणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सातत्याचा अभाव ही काही प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि डिजिटल शिक्षण यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. एकूणच पाहता, सोशल मीडियाने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली असली तरी पारंपरिक प्रशिक्षण केंद्रांसाठी ही मोठी स्पर्धा ठरली आहे. बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करणारेच या स्पर्धेत टिकून राहतील, हे निश्चित आहे.
नागरिकांना माफक आणि घरबसल्या कोर्स करायची सवय झाली आहे. परंतु, यामध्ये बऱ्याच अडचणी आल्यानंतर नागरिकांना याची जाणीव होते.विशाल रिठे, सेवा