लोणावळा: आजची ही वाहतूककोंडी तुमची शेवटची वाहतूककोंडी असून, उद्यापासून मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तुम्हाला कोणत्याही वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा आज शनिवारी खरा ठरला आहे. लॉंग वीकेंडमधील आजचा शनिवार असतानादेखील मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कोठेही वाहनांच्या रांगा न लागल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी सर्व प्रवासी वाहने व एसटी बसेस या मिसिंग लिंक मार्गे गेल्याने घाटाचा संपूर्ण परिसर हा वाहतूककोंडी मुक्त पाहायला मिळाला. खंडाळा घाटाच्या ज्या भागामध्ये सातत्याने व विशेषता शनिवार रविवारच्या सुट्यांच्या कालावधीमध्ये कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसत होत्या, त्या मार्गावर आज तुरळक वाहने पाहायला मिळाली. कोठे वाहतूककोंडीत झालेली नव्हती.
एक्सप्रेस-वेवर शुक्रवारी कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील खंडाळा घाटातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल 7 हजार 100 कोटी रुपये खर्च करत खालापूर ते सिंहगड कॉलेज लोणावळा दरम्यान मिसिंग लिंक तयार केला आहे. यामध्ये दोन बोगदे अनुक्रमे लांबी 1.58 किमी व 8.86 किमी व दोन व्हाय डक्ट पूल अनुक्रमे लांबी 850 मीटर व 650 मीटर याचा समावेश आहे.
आशिया खंडातील या सर्वांत रूंद बोगद्याचे व मिसिंग लिंक मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते. लॉंग वीकेंडचा पहिलाच दिवस असल्यामुळे व मिसिंग लिंक मार्गाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी वाहने रोखून धरण्यात आल्यामुळे शुक्रवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 30 ते 35 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा केल्या होत्या.
जुन्या महामार्गावर तुरळक वाहने
या वेळी नागरिकांची दिलगिरी व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजची ही वाहतूककोंडी तुमची शेवटची असेल. उद्यापासून मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर तुम्हाला कुठेही कोंडीचा सामना करावा लागणार नाही, असे म्हटले होते व त्याचा प्रत्यय आज दुसऱ्याच दिवशी शनिवारी पाहायला मिळाला. जुन्या मुंबई-पुणे महामर्गावर तर वाहनांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. तर, मिसिंग लिंकवर वाहनांची गर्दी असूनदेखील कोठेही वाहतूककोंडी अथवा वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या नाहीत. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील तीस ते पस्तीस मिनिटांचे अंतर कमी झाले असून, अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये खालापूर ते लोणावळा असा प्रवास विना चढउतार वाहन चालकांना मिळत आहे. या प्रकल्पामुळे भविष्यातील मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील व विशेषता खंडाळा घाटामधील वाहतूककोंडीची समस्या पूर्णपणे सुटेल, असे विश्वास वाहनचालक व प्रवासी व्यक्त करत आहेत.