लोणावळा: महाराष्ट्र आणि कामगार दिनाचे औचित्य साधून मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. मात्र, हा आनंदाचा क्षण प्रवाशांसाठी अत्यंत क्लेशदायक ठरला. सलग सुट्यांमुळे झालेली पर्यटकांची गर्दी आणि व्हीआयपींच्या आगमनासाठी रोखलेली वाहतूक यामुळे एक्सप्रेस-वेवर तब्बल 30 ते 35 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
1 मे रोजी शुक्रवार असल्याने, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो मुंबईकर पहाटेपासूनच पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यातच मिसिंग लिंक सुरू होणार असल्याने त्यावरून प्रवास करण्याच्या कुतूहलापोटी वाहनचालकांनी याच मार्गाला पसंती दिली.
खंडाळा ते खालापूर टोलनाका आणि त्याही पुढे अशा सुमारे 30-35 किमीपर्यंत 4 ते 6 पदरी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मिसिंग लोक मार्गाच्या दुपारी 1 वाजता होणाऱ्या उद्घाटनासाठी व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींचा ताफा येणार असल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. उद्घाटन झाल्यानंतरही पुढील दोन तास मार्ग बंद राहिल्याने कोंडीत अधिकच भर पडली.
प्रवाशांचे हाल
तासंतास घाटात अडकल्यामुळे प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. एक्सप्रेस-वेवर पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय नसल्याने महिला, मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले. कडाक्याच्या उन्हात तासनतास इंजिन सुरू राहिल्याने शेकडो वाहने गरम होऊन बंद पडली. तर, अनेकांच्या वाहनांच्या क्लच प्लेट्स खराब झाल्या. एसीदेखील बंद पडले. या महाकोंडीचा फटका सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही बसला. खासदार सुप्रिया सुळे यादेखील या वाहतूककोंडीत तब्बल दोन तास अडकून पडल्या होत्या. दुसरीकडे, पोलिस प्रशासनाकडून मिळणारी वागणूक आणि संवाद नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण होते.
मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त
प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. आजची ही वाहतूककोंडी तुमची शेवटची कोंडी असेल. उद्यापासून मिसिंग लिंकमुळे तुम्हाला या त्रासातून कायमची सुटका मिळेल, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला. दुपारी 3 नंतर मिसिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या नवीन मार्गामुळे 35 ते 40 मिनिटांचा घाट माथ्याचा प्रवास आता केवळ 7 ते 8 मिनिटांवर आला आहे. येत्या विकेंडपासून प्रवाशांना वाहतूककोंडीमुक्त प्रवासाचा आनंद घेता येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आजचा दिवस जरी कोंडीचा ठरला असला, तरी या नवीन प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.