Fever Pudhari
पिंपरी चिंचवड

Monsoon Viral: मोशीत पावसाळ्यात व्हायरल फिव्हरचा फैलाव; डेंग्यू-गॅस्ट्रोचा धोका वाढला

दूषित पाणी व साचलेल्या पाण्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले; डॉक्टरांनी दिला लेप्टोस्पायरोसिसबाबत गंभीर इशारा

पुढारी वृत्तसेवा

मोशी: पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होऊन आजारांचे प्रमाण वाढू लागते. सध्या मान्सूनच्या सुरुवातीलाच ठिकठिकाणी व्हायरल फिव्हर (ताप) आणि सर्दी-खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. वातावरणातील सततच्या चढ-उतारामुळे हवेतील आर्द्रता वाढते, ज्यामुळे विषाणूंचा प्रसार वेगाने होतो. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला व्हायरल फिव्हसह दूषित पाण्यामुळे होणाऱ्या टायफॉइड आणि गॅस्ट्रोएन्टेरायटिस (गॅस्ट्रो) च्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

पहिल्या पावसामुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि डिहायड्रेशनच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. ताप आल्यास तो सामान्य व्हायरल फिव्हर आहे की डेंग्यू, हे ओळखणे गरजेचे आहे. जर ताप दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला, अंगावर पुरळ आले, तीव्र ताप असेल आणि डोळ्यांच्या पापण्यांवर जड होऊन दुखत असेल, तर हे डेंग्यूचे लक्षण असू शकते. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणे आणि तोंडाला कोरड पडणे ही देखील लक्षणे जाणवतात. अशा वेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी?

  • पाणी नेहमी उकळून किंवा फिल्टर केलेलेच प्यावे.

  • उघड्यावरील अन्न, पाणीपुरी किंवा फास्ट फूड (स्ट्रीट फूड) खाणे पूर्णपणे टाळावे.

  • साचलेल्या पाण्यातून जाणे टाळावे आणि पाय नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवावेत.

  • आहारात 'व्हिटॅमिन सी' युक्त फळांचा समावेश करावा, गरम पदार्थ खावेत आणि पुरेशी झोप घ्यावी.

लेप्टोस्पायरोसिसचा धोका

शहरामध्ये पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचते. या साचलेल्या पाण्यातून उघड्या पायाने चालल्यास लेप्टोस्पायरोसिस या गंभीर आजाराचा धोका निर्माण होतो. साचलेल्या पाण्यात उंदरांच्या मुत्राद्वारे 'लेप्टोस्पायरा' नावाचे जंतू पसरतात. जर पायाला आधीच एखादी जखम असेल आणि अशा पाण्यातून चालल्यास हे जंतू शरीरात प्रवेश करतात. यामुळे ताप, अंगावर पुरळ आणि पायांमध्ये तीव्र वेदना सुरू होतात.

सध्या टायफॉइड, गॅस्ट्रो आणि व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ताप तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहत असेल, अशा वेळी घरगुती उपायांवर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी. वारंवार होणारी पोटदुखी, अंगदुखी यासारख्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करू नये. योग्य आहार, व्यायाम यावर भर द्यावा. बाहेरचे, उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.
डॉ. भाग्यश्री लहाने-मुंडे, एमडी मेडिसिन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT