

देहूगाव: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (दि. ७) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने देहूनगरीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. पायी दिंड्यांचे आगमन, टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा-तुकाराम नामाचा अखंड नामघोषामुळे संपूर्ण परिसरात नवचैतन्य संचारले आहे. अशातच गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, जणू पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठीच नदी ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धर्मशाळेत शिरले पाणी
सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून, पित्ती धर्मशाळा, संत गाडगे महाराज धर्मशाळा परिसरात पाणी शिरले आहे. तसेच, पुंडलिक मंदिर परिसरही पाण्याने वेढले गेले आहे. या पार्श्वभूमीवर देहूनगरीत दाखल झालेल्या हजारो वारकरी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक भाविक पावसात भिजत भक्तीचा आनंद लुटताना दिसत आहेत. दरम्यान, नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे संभाव्य धोका लक्षात घेता देहू नगरपंचायतीने नागरिक व भाविकांना घाट परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच, सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी विविध ठिकाणी फलक लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक मंदावली
पूरामुळे इंद्रायणी घाटावरील महिला वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या कपडे बदलण्याच्या खोल्या तसेच अनेक फिरती शौचालये पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे देहू परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती.
परंडवाल चौक, विठ्ठलनगर, काळोखे चौक, मुख्य कमान आणि भैरवनाथ चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाली. पावसामुळे काही काळ देहूतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते.
वारकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे देहूतील इंद्रायणी नदीला पूर आला असून, इंद्रायणी दुथडी वाहू लागली आहे. पित्ती धर्मशाळा, संत गाडगे महाराज धर्मशाळा या परिसरात पुराचे पाणी शिरले असून पुंडलिक मंदिर पाण्याने वेढले गेले आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता वारकऱ्यांनी सतर्क राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी तातडीने सूचना फलक लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली