लोणावळा: योग हा कोणत्याही जातीधर्माचा नसून ते एक आरोग्याचे शास्त्र आहे, हा संदेश देत लोणावळ्याचे प्रसिद्ध योग साधक हभप श्रीमंत रमेशसिंह व्यास राजपुरोहित यांनी योगाच्या क्षेत्रात एक नवा इतिहास रचण्याची तयारी केली आहे. तब्बल २५ वर्षांच्या अखंड तपश्चर्येनंतर, त्यांनी पाण्यावर आणि पाण्याखाली कठीण योगसाधना करून 'जल तत्त्वावर' विजय मिळवला असून, आता ते गिनीज रेकॉर्डसाठी सज्ज झाले आहेत.
'जल योग धाम' म्हणून लोणावळ्याची ओळख
लोणावळा येथील 'तरंग तलाव' आता स्थानिक नागरिकांसाठी 'जल योग धाम' बनले आहे. येथे श्रीमंत राजपुरोहित नियमितपणे जिज्ञासू विद्यार्थ्यांना निःशुल्क जल योगाचे धडे देत आहेत. लवकरच ते योगासनात पाण्यात सर्वाधिक काळ तरंगणे आणि सर्वात खोल पाण्याखालील योग ध्यान या दोन वर्गवारींमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अधिकृत प्रयत्न करणार
जलयोगातील अद्भुत सिद्धी, तंत्र
राजपुरोहित यांनी येथील 'तरंग तलाव' येथे अनेक दुर्मीळ योगिक प्रयोगांचे सादरीकरण केले आहे. यामध्ये १० फूट खोल पाण्यात आधाराशिवाय केलेले 'जल शीर्षासन', पाण्याच्या पृष्ठभागावर स्थिर राहून केलेले 'जल पद्मासन' आणि 'जल शवासन', तसेच हात-पाय व मस्तकावर ५ प्रज्वलित दिवे ठेवून केलेली 'पंच दीप साधना' यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, काही मिनिटांपर्यंत अंतर्गत कुंभक साधून केलेले 'जल गर्भासन' हे त्यांच्या प्रगत योगसाधनेचा पुरावा देणारे ठरले आहे. तज्ज्ञांच्या मते, 'जालंधर बंध', 'उड्डियान बंध' आणि 'महा कुंभक' या क्रियांच्या परमोच्च बिंदूमुळे त्यांचे शरीर पाण्यावर सहज तरंगू शकते, जे योग विज्ञानातील एक आश्चर्य मानले जात आहे.
योग केवळ व्यायाम नव्हे, जीवनप्रक्रिया!
आपल्या साधनेबद्दल बोलताना श्रीमंत राजपुरोहित म्हणाले, हठ योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून, ती एक जिवंत प्रक्रिया आहे. जेव्हा आपण शरीर, मन आणि भावनांची ऊर्जा आपल्या अंतरात्म्यात विलीन करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने परमानंदाची अनुभूती येते. योग म्हणजे कल्पनेतून बाहेर पडून वास्तवाशी जोडले जाणे होय. त्यांनी तरुणांना दररोज किमान १० मिनिटे मोबाईलपासून दूर राहून प्राणायाम करण्याचे आणि शरीराचे मंदिर योगाद्वारे पवित्र राखण्याचे आवाहन केले आहे.
गुरुपरंपरा आणि जागतिक ध्येय
श्रीमंत राजपुरोहित यांना योग गुरू भारत सिंह, योगगुरू अरुण येवले आणि डॉ. बी. आर. शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, ब्रह्मस्वरूप गुरुदेव देवमुनींची कृपा आणि कैवल्यधाम योग संस्थेचे ब्रह्मलीन स्वामी महेशानंदजी यांच्या आशीर्वादाने ते ही साधना पुढे नेत आहेत. भारतीय ऋषी-मुनींची परंपरा आजही जिवंत आहे आणि योग हे पंचमहाभूतांवर विजय मिळवण्याचे विज्ञान आहे, हे जगाला दाखवून देणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.