लोणावळा: घाटमाथ्यावरील पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरामध्ये 22 जूनपासून मान्सून सक्रिय झाला आहे. दोन दिवसांपासून शहरामध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्ये दाखल झालेला मान्सून यावर्षी 22 जून रोजी शहरात दाखल झाला. 22 व 23 जून असे दोन्ही दिवस हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी शहरामध्ये सुरू आहेत. मान्सून सक्रिय झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
लोणावळा व खंडाळा हा परिसर पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणारे वेगवेगळे धबधबे व धरणे यांचा आनंद घेण्यासाठी तसेच वर्षाविहारासाठी लाखो पर्यटक पावसाळ्याच्या सीजनमध्ये या शहरामध्ये येत असतात. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे पर्यटकांचा तसेच स्थानिक व्यावसायिकांचा हीरमोड झाला होता. हवामान विभागाकडून वारंवार मान्सून लांबण्याच्या शक्यता वर्तविल्या जात असल्यामुळे शेतकरी राजादेखील चिंतातुर झाला होता.
मावळ तालुका हा भातशेतीचा तालुका म्हणून ओळखला जातो. भातशेतीला मोठ्या प्रमाणात पावसाची, पाण्याची आवश्यकता असते. मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मावळत बहुतांश भातरोपे पेरणीचे काम पूर्ण झाले होते. पावसाने ओढ दिल्यामुळे भात रोपांची उगवण योग्य प्रकारे होणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली होती. काही ठिकाणी टँकरने पाणी देत रोपे तयार करण्यात आली होती. 22 जूनपासून लोणावळा व परिसरामध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने पुढील आठवडाभरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शहरातील भुशी धरण तुडुंब भरण्यासाठी मोठ्या स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे.
वर्षाविहारासाठी मोठ्या पावसाची गरज
भुशी धरण भरल्यानंतर त्याच्या सांडव्यावरून व खाली असलेल्या पायऱ्यांवरून पाणी वाहू लागते व याच ठिकाणी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या भुशी धरण भरणार केव्हा याकडे लागल्या आहेत.
तळेगाव परिसरात रिमझिम पाऊस
तळेगाव दाभाडे परिसरात मंगळवारी (दि. २३) सकाळपासून ढगाळ वातावरण असून, रिमझिम पाऊस पडत असून, पावसाळी वातावरण आहे. कडक उनापासून आणि उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाल्यामुळे नागरिक समाधानी आहेत. पठार, माळरान, डोंगर भाग अशा ठिकाणी पाण्याची सोय नाही अशा भागातील भातशेतीधारकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी हा पाऊस पडत आहे. तेथे भाताचे रोपे (दाडी) उगवण्यासाठी उपयुक्त होणार आहे. सदर पाऊस तळेगाव, माळवाडी, इंदोरी, सोमाटणे, परंदवाडी, धामणे पवनमावळ आदी भागात पडत आहे.