Indrayani River Water Hyacinth Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Indrayani River Water Hyacinth: इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात; पावसाळ्यापूर्वी हालचाल

प्रदूषण व आरोग्याच्या धोक्यामुळे कारवाई; नदी स्वच्छतेकडे प्रशासनाचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: शहरामधून उगम पावत पूर्वेच्या दिशेने वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती. पावसाळा तोंडावर आला असूनही जलपर्णी काढण्याचे काम थंडावले होते. यासंदर्भातील वृत्त दैनिक ‌‘पुढारी‌’मध्ये प्रसिद्ध होताच नगर परिषद प्रशासनाकडून जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

पात्र झाले होते हिरवेगार

लोणावळ्यातील काही नगरसेवकांनीदेखील सतत जलपर्णी काढण्याची मागणी केली होती. याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाकडून नदीपात्र स्वच्छता व जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहरामधून नदीपात्राचे साधारणता साडेतीन ते चार किलोमीटर अंतर आहे. या संपूर्ण पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली असून, संपूर्ण पात्र हे हिरवेगार झाले आहे. राज्यभरात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत आहे व पुढील दोन महिन्यांत मान्सूनच्या पावसालादेखील सुरुवात होणार आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाली होती. या सर्व बाबींचा विचार करत लोणावळा नगर परिषदेने इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी व काढलेली जलपर्णी ही नदीपात्राच्या कडेला न ठेवता ती दुसरीकडे वाहून नेऊन तिची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करणारे वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाले होते.

ड्रेनेजचे पाणी नदीत

लोणावळा धरणापासून ते वलवण गावाच्या हद्दीपर्यंत नदीपात्र संपूर्ण जलपर्णीच्या विळख्यामध्ये आहे. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यामुळे जलपर्णी काढल्यास ती उन्हामध्ये जळून जाऊ शकते. लोणावळ्यात काही कोटी रुपये खर्च करुन भुयारी गटार व ड्रेनेज योजना राबविण्यात आली. मात्र, तरीदेखील मोठ्या प्रमाणात ड्रेनेज पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. त्याकडेदेखील नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.

गाळ काढण्याच्या कामाला आला वेग

पावसाळा जेमतेम एक महिन्यावर आला असल्याने लोणावळा नगर परिषदेने इंद्रायणी नदी तसेच शहरातील नाले सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, हे काम योग्य प्रकारे होत आहे की नाही यावर लोणावळा नगर परिषदेच्या अधिकारी तसेच नगरसेवकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. इंद्रायणी नदी सफाईच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला काम अगदीच वरवर सुरू होते. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पुन्हा जलपर्णी काढलेल्या ठिकाणी गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच, वरवर काढलेली जलपर्णी पुन्हा मुळांपासून काढण्यास सुरुवात केली आहे. जलपर्णी काढल्यानंतर ती नदीच्या काठावर न ठेवता ती वाहून नेऊन दुसरीकडे टाकावी; अन्यथा पावसात पुन्हा ती वाहून नदीपात्रात येते, असे नागरिकांनी सांगितले आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जलपर्णीमुळे नदी प्रदूषणात वाढ झाली आहे. जलपर्णीमुळे पाण्यात ऑक्सिजन कमी होता. जलपर्णी पाण्याच्या पृष्ठभागावर दाट थर तयार करते. त्यामुळे हवेतून पाण्यात जाणारा ऑक्सिजन कमी होतो आणि पाण्यातील जीवांसाठी परिस्थिती खराब होते. जलपर्णी सुकल्यानंतर ती पाण्यात कुजते. या प्रक्रियेमुळे पाण्यात सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि पाणी अधिक प्रदूषित होते. पाण्याचा प्रवाहदेखील अडतो. दाट जलपर्णीमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह कमी होवून पाणी साचते. त्यामुळे नदीचे आरोग्य आणखी धोक्यात आले होते. जलपर्णीमुळे परिसरात डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच, यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT