Kasarwadi Dangerous Wall Pudhari
पिंपरी चिंचवड

Kasarwadi Dangerous Wall: ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल; कासारवाडीतील धोकादायक भिंत जमीनदोस्त

जलतरण तलाव परिसरातील अर्धवट ढासळलेली संरक्षक भिंत पाडली; नागरिकांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

वल्लभनगर: कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाच्या परिसरातील धोकादायक व अर्धवट ढासळलेली संरक्षक भिंत अखेर पाडण्यात आली आहे. या समस्येबाबत दैनिक पुढारीने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्ताची दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत जीर्ण भिंत जमीनदोस्त केली. त्यामुळे पदपथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कासारवाडी–पिंपळे गुरव या वर्दळीच्या मार्गालगत असलेल्या जलतरण तलावाची जुनी संरक्षण भिंत अनेक महिन्यांपासून अर्धवट ढासळलेल्या अवस्थेत होती. सततच्या पावसामुळे भिंतीची अवस्था गंभीर बनली होती. या पदपथावरून शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या धोकादायक परिस्थितीचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेतली. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धोकादायक भिंत पाडून परिसर सुरक्षित केला. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या भिंतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार होती. अखेर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भिंत पाडण्यात आल्याने नागरिकांनी 'दैनिक पुढारी'चे आभार मानले. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडून प्रशासनाला जागे करण्याचे काम वृत्तपत्राने केल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT