पिंपळे गुरव: कासारवाडी ते नाशिक फाटा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर असंख्य लहान-मोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होत असून, पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाजही येत नाही. या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांवर 'खड्डे चुकवा, जीव वाचवा' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
या मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरणाचा थर उखडला असून, रस्त्यावर खडी आणि डांबराचे तुकडे विखुरले आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये गढूळ पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. अचानक वाहन खड्ड्यात आदळल्याने विशेषतः दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
खड्ड्यांमुळे शारीरिक व्याधीत वाढ
या रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी, रिक्षा आणि अवजड वाहने धावतात. सतत खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहनांना जोरदार धक्के बसतात. त्यामुळे वाहनचालकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याशी संबंधित त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी तर हा प्रवास अक्षरशः कसरतीचा ठरत आहे. त्यातच खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत असल्याने वाहतूक काेंडीत वाढ होत आहे. वर्दळीच्या मार्गावर अशी परिस्थिती कायम राहिल्यास मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसात खड्ड्यांचा अंदाज घेणे कठीण
पावसाचे पाणी रस्त्यावर आणि खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनचालकांना रस्त्याची खोली समजत नाही. खड्ड्यातील पाण्यामुळे दुचाकीचे चाक घसरून वाहनचालक पडण्याचा धोका आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पसरलेली सैल खडीही अपघातास कारणीभूत ठरू शकते.
तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी दुरुस्ती करा
महापालिका प्रशासनाने खड्ड्यांमध्ये केवळ खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी संपूर्ण रस्त्याची पाहणी करून दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. तसेच पावसाचे पाणी साचू नये, यासाठी निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी. अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने आणखी वेळ न दवडता कासारवाडी ते नाशिक फाटा मार्गाची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या पावसामुळे रस्त्यावर ओले आहेत. पाऊस दोन-तीन दिवस उघडला आणि रस्त्यावरील ओल कमी झाली की तात्काळ डांबरीकरणाचे काम करण्यात येईल.महेश बरिंदे, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड मनपा.
सकाळी आणि संध्याकाळी नाशिक फाटा येथे सिग्नलमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि कोंडीत आणखीन भर पडते. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जात आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी.मेहबूब इनामदार, स्थानिक