वल्लभनगर: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना कासारवाडीत समोर आला आहे. कासारवाडी–पिंपळे गुरव या वर्दळीच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावाची जुनी संरक्षक भिंत अनेक महिन्यांपासून अर्धवट ढासळलेल्या अवस्थेत आहे. ती थेट पदपथालगत उभी आहे. सततच्या पावसामुळे भिंतीची अवस्था अधिकच धोकादायक बनली असून, ती कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
यामध्ये आणखी गंभीर बाब म्हणजे जीर्ण झालेल्या या भिंतीला खेटून महावितरण (एमएसईबी) विभागाचा मोठा केबल रोल ठेवण्यात आला आहे. या अवजड केबल रोलचा अतिरिक्त भार आधीच कमकुवत झालेल्या भिंतीवर पडत असल्याने ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे पदपथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे जलतरण तलावाच्या आवारात महापालिकेने नव्याने मजबूत संरक्षण भिंत उभारली आहे.
मात्र, त्याच्याबाहेरील जुनी व जीर्ण झालेली भिंत हटविण्याऐवजी तशीच सोडून देण्यात आली आहे. नवीन भिंत उभारल्यानंतरही धोकादायक ठरलेली जुनी भिंत पाडण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित विभागाला या धोकादायक स्थितीची माहिती असूनही अनेक महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पादचाऱ्यांच्या जीविताला धोका
या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. जलतरण तलावाच्या शेजारीच उद्यान असल्यामुळे संध्याकाळी व सकाळी उद्यानात जाणारे नागरिक याच पदपथाचा वापर करतात. पदपथालगतच ढासळलेली ही भिंत असल्याने पादचाऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचत असून, भिंतीची पकड कमकुवत झाली आहे. त्यातच भिंतीला लागून ठेवलेल्या एमएसईबीच्या अवजड केबल रोलमुळे भिंतीवर अधिक ताण निर्माण होत असून, मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
अर्धवट ढासळलेली जुनी संरक्षण भिंत तातडीने पाडण्यात यावी.
भिंतीला लागून ठेवलेला एमएसईबीचा अवजड केबल रोल तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावा.
दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक परिसरात त्वरित सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्यात यावेत.
पदपथ मोकळा करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने दुरुस्ती व सुरक्षिततेची कामे हाती घ्यावीत.
कासारवाडीतील नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रश्नाकडे महापालिकेसह महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.
जलतरण तलावाच्या परिसरातील जुन्या संरक्षक भिंतीची सद्यस्थिती पाहून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. येत्या आठवडाभरात संबंधित काम करून घेण्यात येईल.जे. डी. देवकर, उपअभियंता, ह क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड मनपा.
जुनी संरक्षक भिंत बऱ्याच दिवसांपासून जीर्ण अवस्थेत आहे. भिंत पदपथालगत असल्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागांनी याची पाहणी करून वेळ न दवडता आवश्यक ती कार्यवाही करावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडणार नाही.सहादू धावडे, स्थानिक नागरिक.