दापोडी: दापोडी येथील एका शालेय विद्यार्थ्याला कुत्र्याने बुधवारी चावा घेतला. या घटनेत श्लोक नितीन हिवाळे हा विद्यार्थी जखमी झाला आहे. शाळेतून घरी जात असताना जय भीमनगर येथील वाज चाळ चर्चशेजारी येथे एका इसमाने सात ते आठ कुत्री पाळलेले आहेत. आतापर्यंत अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या कुत्र्यांची एवढी दहशत आहे की, या रस्त्याने सामान्य नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कामाला जाणारे, रात्री येणाऱ्यांना सुद्धा या रस्त्याने जायला भीती वाटते. संबंधित व्यक्तीला सांगायला गेले की भांडण करतात. यामुळे दापोडीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने वेळेत लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा.
फुगेवाडी व दापोढी परिसरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी पहाटेच्या वेळी व रात्रीच्या वेळी ही मोकाट कुत्रे नागरिकांचा चावा घेत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या मोकाट कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दापोडीतील हुतात्मा भगतसिंग व विविध शाळांच्या गेटसमोर मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त असते. शाळा सुटली की ही कुत्री विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जातात. यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही मुलांना घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या पालकांना देखील ही मोकाट कुत्री चावा घेत आहेत. आशा घटना यापूर्वीदेखील घडल्या आहेत.
रस्त्यातील कचऱ्यामुळे कुत्र्यांचे प्रमाण वाढले
हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यात अन्नाच्या शोधात मोकाट कुत्रे येत आहेत. रात्रीच्या वेळी कुत्री अचानक वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या अंगावर धावून येत असल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे.
कुत्र्याने चावा घेतल्यास तात्काळ जखम साबणाने धुऊन महापालिका किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन अँटी रेबीज लस घेणे बंधनकारक आहे. ज्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे, त्या परिसराची त्वरित पाहणी केली जाईल. त्या ठिकाणी कर्मचारी पाठवून तसेच श्वान पकडण्यासाठी वाहने पाठविले जातील. मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी केली जाईल.- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.
महापालिका प्रशासनाकडून नसबंदी व लसीकरणावर १०-२० कोटींचा खर्च केला जात असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात कुत्र्यांची वाढती संख्या आणि दहशतीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.- रवींद्र कांबळे, स्थानिक.