Parliament Monsoon Session
पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरुन चर्चा घेण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी संसदेच्या उभय सदनात आज (दि.२७) प्रचंड राडेबाजी केली. काॅंग्रेस, तृणमूल, द्रमुकसहित इतर विरोधी सदस्यांनी केलेल्या फलक आणि घोषणाबाजीमुळे बहुतांश कामकाज वाया गेले. दरम्यान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव पुढील आठवड्यात चर्चा आणि मतदानासाठी घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Parliament Monsoon Session)
लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तमाम विरोधी सदस्यांनी 'वेल'मध्ये येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे संसद चालत नाही, असे सांगत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारच्या सत्रात गोंधळातच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यावर निवेदन केले. गदारोळावर संतप्त झालेल्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काॅंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांना बोलू दिले जाणार नाही, असे सांगितले. यावर गोंधळ जास्तच वाढला.
विरोधी सदस्यांकडून यावेळी 'इंडिया, इंडिया' च्या तर सत्ताधारी सदस्यांकडून 'मोदी, मोदी' च्या घोषणा देण्यात येत होत्या. गोंधळामुळे अखेर पीठासीन अधिकाऱ्यांना कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर जनविश्वास विधेयक मंजूर करण्यात आले.
Parliament Monsoon Session : विरोधी नेते करणार मणिपूरचा दौरा…
दरम्यान विरोधी 'इंडिया' आघाडीचे नेते येत्या 29 जुलै आणि 30 जुलै रोजी मणिपूरचा दौरा करणार असल्याची माहिती काॅंग्रेसचे नेते मणिकम टागोर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विरोधी पक्षांच्या वीसपेक्षा जास्त खासदारांचा समावेश मणिपूरला जाणाऱ्या शिष्टमंडळात असेल, असे टागोर म्हणाले. याआधी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूरचा दौरा करुन हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले होते.
विरोधकांना काळे कपडे घालून फिरावे लागेल
विरोधी खासदार संसदेत काळे कपडे घालून आले होते. यावर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काळे कपडे घालून आल्याने काय होणार आहे? पुढे जाऊन या लोकांना काळ्या कपड्यातच फिरावे लागणार असल्याचा टोला मारला. काॅंग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी इतर विरोधी पक्षांशी कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यांनी कोणाचाही सल्ला न घेता हा प्रस्ताव दिला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्षांचा विश्वास जिंकायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. तो देशातील जनतेने 2014 आणि 2019 मध्ये दाखवून दिला आहे आणि 2024 मध्ये दाखवून देईल. अविश्वास प्रस्ताव आणून काळे कपडे घालून काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.
Parliament Monsoon Session : काळे कपडे घालून…
काळे कपडे घालून आलेल्या विरोधकांवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही टीका केली. ज्यांचे मन काळे आहे, त्यांच्या ह्दयात आणखी काय असणार? यांचे मन काळे, यात काळा पैसा लपविला आहे काय? यांचे नेमके काय कारनामे आहेत, जे यांना दाखवायचे नाहीत. गंभीर विषयावर राजकारण केले जात आहे, असे गोयल म्हणाले. 'आप' चे खासदार राघव चड्डा यांच्यावर संसद आवारात कावळ्याने हल्ला केला होता. त्याचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, आजकाल काळे कावळेही त्यांच्याकडेच आकर्षित होत आहेत. त्यांचा भूतकाळ काळा होता, वर्तमानकाळ काळा आहे आणि भविष्यही काळेच राहणार. आम्ही नकारात्मक विचारांचे लोक नाही. त्यांच्या जीवनातील अंधार संपून जीवन प्रकाशमान होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.