मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Palghar)
पाण्यासाठी आदिवासी बांधवांची परवड सुरु आहे, पाण्यासाठी त्यांना अत्याचार सहन करावे लागत आहेत, तरी आदिवासी पाड्यांवर पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी सुध्दा अजित पवार यांनी केली. आपण जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या दोन दिवस आधी पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा येथे ६ मार्च २०२३ रोजी पाण्यासाठी आदिवासी महिलांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली.
राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची परवड होत आहे, राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, गुन्हा दाखल करायला सुध्दा विलंब करण्यात आला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीकरुन पिडीत आदिवासी भगिनींना न्याय द्यावा, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा