पुढारी ऑनलाईन डेस्क: पाकिस्तानमधील नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी मतदान झाले. यानंतर ६७ तासांनंतर सर्व जागांचे निकाल आले आहेत. मात्र, अद्याप निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पीटीआय आणि बिलावलच्या पीपीपीने अनेक जागांवर फेरफार केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आज ( दि. ११) इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरले . (Pakistan Election 2024)
सरकार स्थापन करण्यासाठी 134 जागांवर बहुमत आवश्यक आहे. पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने 3 पक्षांमध्ये स्पर्धा आहे. यामध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचा समावेश आहे. निवडणुक आयोगाने अद्याप अधिकृत निकाल घोषित केला नाही. निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. इम्रान खान यांना पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार ९२ जागांसह आघाडीवर आहेत. नवाज यांचा पक्ष ७५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, असा अंदाज आहे. (Pakistan Election 2024)
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३३६ जागा आहेत. त्यापैकी २६५ जागांवर निवडणूक झाली. एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, तर एका जागेचा निकाल NA-८८ फेटाळण्यात आला आहे.यानंतर आता गुरूवारी १५ फेब्रुवारीला येथे पुन्हा मतदान होणार आहे. उर्वरित ७० जागा राखीव आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तान निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप इम्रान खान समर्थकाने केला आहे. दरम्यान, याच्या निषेधार्थ इम्रान समर्थक रस्त्यावर उचरले असून, त्यांच्याकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. निदर्शनांविरोधात पोलिसांनी पीटीआयच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात पीटीआय समर्थित दोन उमेदवारांचाही समावेश आहे.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची यादी जाहीर केली आहे जिथे पुन्हा मतदान घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
NA-88 खुशाब-II पंजाब
हिंसक जमावाने मतदान साहित्याची नासधूस केल्यानंतर येथील २६ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे.
PS-18 घोटकी-I सिंध
अज्ञातांनी मतदान साहित्य हिसकावून घेतल्याने येथील मतदार संघातील दोन मतदान केंद्रांवर ८ फेब्रुवारी रोजी पुन्हा मतदान होणार आहे.
PK-90 कोहाट-I खैबर पख्तूनख्वा
निवडणुकीच्या दिवशी दहशतवाद्यांनी मतदान सामग्रीचे नुकसान केल्यामुळे, ECP ने खैबर पख्तुनख्वाच्या २५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.