West Bengal Assembly Election 2026
नवी दिल्ली, प्रथमेश तेलंग
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १६ जिल्ह्यातील १५२ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होईल. या मतदारसंघांमध्ये एकूण १४७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंगळवारी, पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार थांबला. यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होईल. तर ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये लढत आहे. तर काँग्रेससह डावे पक्ष म्हणावे तेवढे शर्यतीत नाहीत.
ममता बॅनर्जी २०११ मध्ये मुख्यमंत्री झाल्या तेव्हापासून त्या पदावर आणि सत्तेत कायम आहेत. भाजपने ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी २०२१ मध्ये खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा भाजपने ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय नेते, भाजपचे वरिष्ठ नेते अशा सगळ्या दिग्गजांची फौज ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी कामाला लागली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या काळात राज्यात हिंसाचार वाढला असून कायद्याचे राज्य राहिले नाही. बंगालची अस्मिता टिकवण्यासाठी भाजपला सत्ता द्यावी, असे आवाहन या नेत्यांनी जनतेला केले. मात्र, तृणमूल काँग्रेसला पराभूत करणे एवढे सोपे नसल्याची जाणीव भाजपला देखील आहे. "एक ममता बॅनर्जी म्हणजे सात शरद पवार" असे भाजपचे वरिष्ठ नेते खाजगीत बोलताना म्हणतात. यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज आपल्याला लावता येईल.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने मतदार यादी सखोल पडताळणी मोहीम म्हणजेच एसआयआरवरून केंद्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला घेतल्याचं प्रयत्न केला. ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या महिला नेत्यांनी या निवडणुकीत केंद्र सरकारवर सडकून टीका करत प्रचार केला.
पहिल्या टप्प्यात उत्तर बंगाल भागातील सर्व ५४ मतदारसंघात मतदान होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून या भागात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१९ ला या भागातील ८ पैकी ७ आणि २०२४ मध्ये ६ लोकसभा जागा भाजपने जिंकल्या. तर २०२४ च्या निवडणुकीत ५४ पैकी ३१ विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर होता. यामुळे भाजपसाठी पाहिला टप्पा महत्वाचा ठरणार आहे. यासोबतच मुस्लिम मतदारांची टक्केवारी राज्यात जास्त असल्याने तृणमूल काँग्रेसला त्याचा फायदा होईल असे मानले जाते.